अहमदनगर : लॉकडाऊन असताना देखील मुंबईहून लपून-छपून आलेल्या अतिउत्साही जावयाने पारनेर तालुक्याची झोप उडवली आहे. जावयाला ‘कोरोना’ झाल्याचं मृत्यूनंतर उघड झाल्याने दोनशे जणांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण बरे होत आहेत, तर काही जणांना प्राण गमवावे लागत आहेत. मात्र अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास नागरिकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत आहे.
पारनेरच्या पिंपरी जलसेन या गावात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. लपून-छपून आलेल्या मुंबईच्या अतिउत्साही जावयाने साऱ्या गावाला भेट दिली. या जावयाने मुंबईतील घाटकोपर ते पारनेर असा प्रवास केला होता. त्यानंतर सासुरवाडीला म्हणजे पिंपरी जलसेनपर्यंत जाऊन त्याने नातेवाईकांच्या भेटीगाठी घेतल्या.
मृत्यूनंतर जावयाला ‘कोरोना’ असल्याचं समजलं. मृत जावयाच्या थेट संपर्कात आलेले आणि संपर्कात आलेल्यांच्या संपर्कातील किंवा माहितीतील किमान 200 जण संशयित रुग्ण झाले आहेत.