Home शहरे उस्मानाबाद जमिनीसाठी पुतण्याने केला चुलत्याचाच खून

जमिनीसाठी पुतण्याने केला चुलत्याचाच खून

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २१ मे : जमिनीच्या वादातून उस्मानाबाद जिल्हा आणखी एका खुनाने हादरला आहे. दोन दिवसांपूर्वी सोमवारी किरकोळ कारणावरून एकाचा खून झाला होता. आता शेतजमिनीच्या वाटणीवरून पुतण्याने इतर साथीदारांच्या साहाय्याने चुलत्याचाच खून केल्याचा थरारक प्रकार घडला आहे.

उमरगा तालुक्याच्या औरादचे रहिवाशी दिगंबर गणपती दुधभाते (४२ वर्षे) हे बुधवारी २० मे रोजी शेतातील कामे आटोपून संध्याकाळी मुलगा शिवकांतसह घराकडे परतत होते. तेव्हा रस्त्यातच त्यांचा पुतण्या अक्षय शेषेराव दुधाभाते आणि त्याचे साथीदार मुकेश विनायक कांबळे व अन्य तीन अनोळखी लोकांनी त्यांचेवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. कांही दिवसापूर्वीच दुधाभाते यांचे भावकी सोबत जमीन वाटणीच्या कारणावरून भांडण झाले होते. असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान उपस्थित लोकांपैकी सुशांत कारभारी, संतोष गायकवाड, शिवाजी गायकवाड, महादेव गायकवाड, यशवंत पवार यांनी हल्लेखोरांनी चालवलेली मारहाण थांबवली. मारहाण करून हल्लेखोर पसार झाले. दरम्यान जखमी दिगंबर यांना लातूर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मयत दिगंबर दुधभाते यांच्या पत्नी दैवता यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अक्षय शेषेराव दुधभाते, मुकेश विनायक कांबळे व तीन अनोळखी पुरुष अशा पाच व्यक्तींविरुध्द खुनाचा गुन्हा उमरगा पोलिस ठाण्यात नोंदवला आहे.