शाफिक शेख :-
मुंबई आणि राज्यात कोरोनाबाधितांच्या संसर्गाची आणि संर्सगामुळे होणा-या मृत्यूची संख्या वाढत असतानाच कुठेतरी ही संख्या हा मृत्यूदर कमी दाखवण्यासाठी हेराफेरी करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार आणि मनपा प्रशासन करत असल्याचा आरोप भाजपाचे उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी केला आहे.
ते म्हणाले की, भांडूप येथे राहणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीला 28 मे रोजी सायन रुग्णालयात भरती करण्यात आले, 31 तारखेला त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी रुग्णालयाकडून न्युमोनिआमुळे झालेला मृत्यू, असा अहवाल दिला गेला. त्यांच्यावर कुटुंबियांनी अंत्यसंस्कारही केले आणि आता मनपा प्रशासनाकडून फोन करुन नातेवाईकांना सांगण्यात आले की संबधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यानंतर मनपाकडून संबंधित व्यक्ती राहात असलेली चाळ सील करण्यात आली. मृत्यूच्या दाखल्यामध्ये मृत्यू निमोनिआमुळे झाल्याचे सांगितले, अंत्यसंस्कार केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह कसा येतो ?
याबाबत सोमैया यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पत्र लिहून संबंधित प्रकऱणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आजपर्यंत अनेक रुग्णांच्या मृत्यू दाखल्यात सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू असे दाखवले जाते, कुटुंब त्यानुसारच अंत्यसंस्कार करते आणि अंत्यसंस्कारानंतर रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मनपा प्रशासन देते. तर मग ज्या परिवारात मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबातील लोकांचे काय, त्यांच्यामध्ये जो कोविडचा संसर्ग होत आहे, त्याला जबाबदार कोण? ठाकरे सरकार निव्वळ कोरोनामुळे होणारे मृत्यूदर लपवण्यासाठीची हेराफेरीच करत असल्याचे दिसून येत आहे, असेही मा. किरीट सोमैया म्हणाले.