Home ताज्या बातम्या रुक्मिणी मातेच्या पालखीला परवानगी नाही, वारकरी नाराज

रुक्मिणी मातेच्या पालखीला परवानगी नाही, वारकरी नाराज

सातशे वर्षांपासून सुरू असलेली पायी वारी यंदा होणार नाही. कोरोनामुळे आषाढीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं मोजक्या प्रतिनधींच्या उपस्थित प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाचा सोहळा दोन दिवसांवर आला आहे.

पण आळंदीचा मंदिर परिसर कंटेनमेंट झोनमध्ये असल्यामुळे काही मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पादुकांची पूजा होऊन पालखीचं प्रस्थान होईल पण त्या पादुका 13 ते 30 जून या काळात देऊळ वाड्यात राहतील, अशी माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा संबंधी देवस्थान विश्वस्थांची बैठक पार पडली. प्रशासनाने दिलेल्या पर्यायानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी पादुका पंढरपूरला पोहचतील. मात्र, अद्याप पर्यायांबाबत प्रशासनाचा कोणताच निर्णय आलेला नाही, असे प्रांताधिकारी तेली म्हणाले आहेत.

विदर्भातून पंढरपूरला जाणारी रुक्मिणी मातेच्या वारीला परवानगी नाही

विदर्भातून कौंडिण्यपूर येथून जाणाऱ्या रुक्मिणी मातेच्या पालखीला परवानगी नाकारण्यात आल्यामुळे तब्बल 425 वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. अमरावतीतील कौंडिण्यपूर येथून दरवर्षी पंढरपूरला वारी जाते यावेळी पायी वारी जाणार नसल्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसत आहे.

दशमीलाच जातील पादुका

आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वांत मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूची साथीमुळे पायी आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असं असलं तरी आळंदी आणि देहूहून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पादुका दशमीला पंढरपूरला जातील.

या पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमान यापैकी कशाने नेणार याबाबतचा निर्णय नंतर होणार आहे. पण देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनामध्ये बैठकीत झाली.

या बैठकीला उपस्थित असलेले देहू पालखी सोहळ्याचे प्रमुख विशाल मोरे यांनी सांगितलं की “पालखी प्रस्थान ठरल्या दिवशीच करेल. पण पादुका तिथेच ठेवल्या जातील. त्यानंतर दशमीच्या दिवशी राज्य सरकारनं सांगितल्याप्रमाणे, त्या त्या जिल्ह्याचे पालक मंत्री आणि कलेक्टर सांगतील तसं पादुका पंढरपूरला जातील. मग त्या विमानानं नेतील, की हेलिकॉप्टरनं नेतील की एसटी बसनं नेतील, किती लोक त्यात जातील हा निर्णय स्वतः राज्य सरकार घेणार आहे.


तो निर्णय संस्थानांच्या प्रमुखांना सांगितला जाईल. त्याअनुषंगानं पादुका पंढरपूरला जातील. एकादशीला संतांची तिथे पांडुरंगाशी भेट होईल. जर पौर्णिमेपर्यंत थांबण्याची परिस्थिती असेल, तर तिथे थांबण्याची परवानगी देतील नाहीतर एकादशीच्या दिवशी परत यावं लागेल.” असं देहूच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विशाल मोरे म्हणाले.

सगळ्या मुख्य पालख्यांच्या प्रतिनिधींसोबत एकत्र बैठक झाली आणि सगळ्यांना निर्णय मान्य आहे.

यंदा आषाढी एकादशी 1 जुलैला आहे. त्यासाठी परंपरेनुसार सुमारे तीन आठवडे आधी म्हणजे 12 जून रोजी देहू येथून संत तुकराम यांच्या तर 13 जून रोजी आळंदीतून संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचं प्रस्थान नियोजित आहे.

कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं.

“श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून, विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल,” असं पवार म्हणाले होते.

याआधी वारी कधी रद्द झाली होती का?

असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी शंभर, सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेग, कॉलरा, फ्लू अशा आजारांच्या साथी आल्या, तेव्हा पंढरपूर ओस पडलं होतं. त्यावेळी स्वरूप बदलून वारीचं आयोजन करण्यात आल्याचं तिथले ज्येष्ठ रहिवासी सांगतात.

यंदा चैत्रातली वारीही लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली होती. दर महिन्याला वारी करणारे वारकरीही गेल्या दोन महिन्यांत इथे आलेले नाहीत.