Home शहरे नाशिक तीन प्रवासी नियम लागू होताच रिक्षाभाडेवाढ

तीन प्रवासी नियम लागू होताच रिक्षाभाडेवाढ

भगूर : रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी भाडे आता तीस रुपये इतके झाले आहे. या भाडेवाढीमुळे प्रवासी वर्गात नाराजी असताना चालकांनी मात्र पोलिसांच्या नियमावर खापर फोडले आहे. भाडेवाढ प्रवाशांना परवडत नसल्याचे काही रिक्षाचालकांचे म्हणणे असले तरी त्याशिवाय पर्याय नसल्याचेही म्हटले आहे.
भगूर बसस्थानक ते नाशिकरोड बिटको प्रवासादरम्यान रिक्षाचालकांनी सध्याच्या वीस रुपये भाडे दरात दहा रु पये वाढ केली आहे. त्याप्रमाणेच भगूर देवळाली कॅम्पपर्यंत पाच रु पयांची भाडेवाढ केल्याने प्रवासी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भगूर ते बिटको वीस रु पये इतकेच भाडे होते. बसलादेखील तितकेच तिकीट पडत असल्याने प्रवासी बसची वाट न पाहता थेट रिक्षाचा प्रवास करीत होते. शिवाय पूर्णांकात भाडे असल्याने सुट्टे पैशांची अडचणी येत नव्हती. त्यामुळे प्रतिसाद चांगला होता.
त्याबरोबरच भगूर ते देवळाली कॅम्प १० रु पये प्रतिसीट याप्रमाणे असे रिक्षाभाडे होते. आता तेथेही वाढ करण्यात आलेली आहे. गेल्या ८ जून रोजी पोलिसांनी रिक्षाचालकांची बैठक घेऊन रिक्षात फक्त तीनच प्रवासी घेऊन वाहतूक करण्याचा सक्त आदेश दिल्याने रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी ८ जूनपासून भगूर ते देवळाली कॅम्प १५ रुपये, भगूर ते बिटको ३० रु पये, भगूर ते देवळाली रेल्वेस्टेशन २० रु पये रिक्षाभाडे घेण्यास सुरु वात केली आहे.