Home बातम्या राष्ट्रीय खळबळ! रात्री क्रिकेटचा सामना रंगला होता, अचानक गोळीबार झाला अन्

खळबळ! रात्री क्रिकेटचा सामना रंगला होता, अचानक गोळीबार झाला अन्

0
खळबळ! रात्री क्रिकेटचा सामना रंगला होता, अचानक गोळीबार झाला अन्

हायलाइट्स:

  • क्रिकेट खेळताना तरुणावर गोळीबार
  • अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील घटना
  • पोलिसांनी दोघा संशयितांना केली अटक

म. टा. प्रतिनिधी, नगर : नेवासा तालुक्यातील भेंडा येथे रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका मैदानावर काही युवक क्रिकेट खेळत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी खेळाडूंच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय २१, रा. भेंडा) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लॉकडाउनचे नियम कठोर करण्यात आल्याने मैदानावर खेळण्यासही निर्बंध आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास क्रिकेटचे सामने सुरू आहेत. भेंडा गावातील एका मैदानावर काही तरुण क्रिकेट खेळण्यासाठी येतात. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तेथे काही युवक क्रिकेट खेळत होते. अचानक दोघे जण दुचाकीवर थेट मैदानात आले. त्यांनी खेळाडूंच्या दिशेने गोळीबार केला. त्यातील एक गोळी सोमनाथ तांबे याच्या छातीत लागल्याने तो खाली कोसळला. बाकीचे खेळाडू त्याच्या मदतीला धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला नेवासा फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात जाऊन जखमी तांबे यांच्याकडे विचारपूस केली. त्याने दिलेली माहिती आणि वर्णनावरून संशयित पप्पू जावळे व गणेश पुंड यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रेमप्रकरणातून जावयाने केला सासूचा खून

आरोपींनी तांबे याच्यावर गोळीबार का केला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा गावातील आणखी कोणाशी तरी वाद होता. तोही मैदानावर खेळत असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी त्याच्यावर हल्ला करण्यासाठी मैदानावर आले होते. मात्र, चुकून तांबे याला गोळी लागली असावी, असेही सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींकडे कसून चौकशी सुरू असून लवकरच घटनेचा आणि त्यामागील कारणाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. नेवासा तालुक्यात गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर केला जातो. वाळू तस्करांकडून आणि रस्ता लुटीचे गुन्हे करण्यासाठी ही शस्त्र वापरली जात असल्याचे आतापर्यंत अनेकदा पुढे आले आहे. गुन्हेगारी टोळ्याही अशी शस्त्रे बाळगून आहेत. मात्र, किरकोळ भांडणांसाठीही युवकांकडून गोळीबार केला जाऊ लागल्याचे प्रकार आता पुढे येऊ लागले आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटितेवर अत्याचार; गुन्हा दाखल

Source link