कोविडव्यतिरिक्त इतर आजार असलेल्या एका रुग्णाला मुलुंडमधील खासगी रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले नाही. वेळेत उपचार न मिळू शकल्यामुळे या रुग्णाला प्राण गमवावे लागल्याचा गंभीर आरोप मनसेचे उपाध्यक्ष सत्यवान दळवी यांनी केला आहे. अनेक नॉनकोविड रुग्णांना रुग्णालयाच्या आवारात घेण्यास टाळाटाळ केली जाते. ‘आधी आरटीपीसीआर टेस्ट करा मगच या’ अशी उत्तरे दिली जातात. यामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य कर्मचारी आज देवदूत बनून काम करीत आहेत. त्यांच्यावर असलेल्या ताणाची सगळ्यांनाच कल्पना आहे. पण नॉन कोविड रुग्णालयांनीही इतर रुग्णांच्या उपचारांकडे दुर्लक्ष करू नये. एखाद्या रुग्णाला करोना संसर्गाची लक्षणे असतील, तर एखाद्या खोलीत तात्पुरती आयसोलेशनची व्यवस्था करावी. पण निदान रुग्णांना प्राथमिक उपचार द्यावेत, अशी अपेक्षा आम्ही रुग्णालयांना पाठवलेल्या पत्रात केली असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.