प्रशासनातर्फे लसीकरण मोहीमेवर भर देऊन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र,खेड्यापाड्यातील नागरिक तपासणी आणि लसीकरणासाठी पुढे येत नसल्याने बहुतांश ठिकाणी प्रशासनाला जनजागृती करावी लागत आहे. एकीकडे शहरात लसीकरण केंद्रात मोठी गर्दी बघायला मिळत आहे. तर, खेड्यापाड्यातील नागरिक अजूनही करोना तपासणी तसेच लसीकरणासाठी पुढे येत नसल्याने आता ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. एटापल्ली तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन थेट गावबंदी करून गावात कोणालाही प्रवेश न देणे आणि गावातील लोकांना बाहेर न जाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.एवढेच नव्हेतर आरोग्य विभागाशी संपर्क करून गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून घेण्यात येत आहे.
ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास करोनावर मात करणे शक्य आहे. मात्र,बहुतेक शहरात अजूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. अश्या परिस्थितीत खेड्यापाड्यातील नागरिकांनी घेतलेला ‘गावबंदी’चा निर्णय करोनाची साखळी तोडायला नक्कीच मदत होणार असल्याने या निर्णयाची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.