Home शहरे जळगाव उत्राण मध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान शेतांमध्ये पाणीच पाणी

उत्राण मध्ये अतिवृष्टीने प्रचंड नुकसान शेतांमध्ये पाणीच पाणी

एरंडोल : जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु असू शुक्रवारी दुापरी एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे दोन ते चार वाजेदरम्यान अतिवृष्टी झाल्याने येथे प्रचंड नुकसान झाले असून ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहे. या दोन तासात ११० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. आहे. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
या पावसामुळे निलॉन्स कंपनीच्या लोणच्याने भरलेल्या मोठ्या प्लॅस्टीकच्या बरण्या पाण्याबरोबर गावात वाहून आल्या. तसेच अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे कित्येक घरांची पडझड झाली. त्यामुळे लाखो रुपयांची हानी झाली. काही शेतकऱ्यांची शेती पिके वाहून गेली. महादू देविदास खैरनार यांच्या राहत्या घरात पावसाचे पाणी शिरले तसेच अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळेप्रचंड नुकसान झाले तर काही झाडांची पडझडही झाली शेतावरील बांध फुटून शेते तलावा सारखी झाली. गाव जलमय झाले व गावातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत अशी मागणी एरंडोल पंचायत समितीचे उपसभापती तथा उत्राण येथील रहिवासी अनिल महाजन यांनी केली आहे.
दरम्यान शनिवारी सकाळी ८ वा. तालुका प्रशासनाने पावसाच्या केलेल्या नोंदीनुसार तालुक्यात शुक्रवारी मंडळ निहाय झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
उत्राण ११० मिलिमीटर, एरंडोल १६ मिलिमीटर, रिंगणगाव १९ मिलिमीटर ,कासोदा ७मिलिमीटर. विशेष हे की उत्राण येथे अतिवृष्टी झाली मात्र परिसरातल्या गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले.