Home अश्रेणीबद्ध भिगवण उपबाजारातील गोडाऊन धोकादायक

भिगवण उपबाजारातील गोडाऊन धोकादायक

भिगवण  : येथील उपबाजार समितीमधील गोडाऊन धोकादायक झाले आहे. हे गोडाऊन केव्हाही ढासळण्याची शक्यता आहे. बाजार समिती प्रशासन आणि गोडाऊन मालक अडतदार याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. १२ महिने पाठपुरावा करूनही बाजार समितीकडून अडतदाराला नोटीस देण्याखेरीज कोणतीही कारवाई झाली नाही..
इंदापूर बाजार समितीच्या उपबाजार भिगवण समितीचे पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी असणाऱ्या मालकीच्या जागेत व्यापारी गाळे आणि आडतदार यांना माल साठविण्यासाठी गोडावून उभारलेले आहेत.मात्र अनेक वर्षांचा काळ उलटून गेल्याने या गोडावूनच्या इमारतींना तडे गेल्याचे पाहावयास मिळते.अशाच प्रकारे २० फुट उंची असलेले गोडावूनला गेल्या पावसाळ्यात तडे गेल्याचे दिसून आल्याने याची माहिती मार्केट कमिटी प्रशासनाला देण्यात आली होती.मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने या इमारतीचा काही भाग रात्रीच्या वेळेस ढासळला होता.यावर लोकमतने बातमी प्रसारित करून पावसाळ्याच्या दिवसात धोकेदायक इमारत ढासळून गंभीर अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली होती.यावर मार्केट कमिटी प्रशासनाने तातडीने कारवाई करीत आडतदाराला नोटीस देत ७ दिवसाच्या आत धोकेदायक इमारतीचा भाग काढून घेण्यास सांगितले होते.
यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती यशवंत माने यांनी आडतदार यांनी सात दिवसात कार्यवाही न केल्यास मार्केट प्रशासन ही इमारत पाडणार असल्याचे ‘ लोकमत ‘ च्या प्रतिनिधीना सांगितले होते.मात्र, या बाबींना १२ महिन्याचा काळ लोटूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.तसेच आजच्या घडीला वादळ आणि पावसाळ्याचे दिवस सुरु असून बाजाराच्या दिवशी पावसापासून वाचण्यासाठी शेतकरी याच इमारतीच्या आडोशाला उभे राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे घटना घडल्यावरच मार्केट प्रशासन जागे होणार काय असा सवाल उपस्थित होत आहे.
याबाबत इंदापूर बाजार समितीचे स्थानिक सदस्य आबासाहेब देवकाते तसेच अनिल बागल यांच्याशी संपर्क साधला असता अशी धोकेदायक इमारत हटविणे गरजेचे असल्याचे सांगत याविषयी बाजार समितीचे सचिव जीवन फडतरे यांना याविषयी सूचना करणार असल्याचे सांगितले.
याबाबत बोलताना बाजार समितीचे सचिव जीवन फडतरे यांनी धोकादायक इमारती विषयी सबंधित आडतदार यांचा मार्केट कमिटीशी असणारा करार संपून गेला असल्याने धोकादायक इमारत तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगून याबाबतची आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले .तसेच आडतदार यांनी इमारत हटविने कामात हलगर्जीपणा केल्यास मार्केट कमिटीच्या कर्मचारी आणि साधनातून इमारत हटविली जाणार असल्याचे सांगितले.
……….
४स्थापनेपासून काँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखाली असणाºया बाजार समितीची  सत्ता हिसकावून राष्ट्रवादी सत्तेत आल्याने भिगवण बाजार समितीत फार सुधारणा होतील, अशी व्यापारी वर्गाची आणि भिगवण ग्रामस्थांची आशा होती. मात्र, तीन वर्षांत गाळेधारकांना भाडेवाढ आणि डिपोझीटवाढ याशिवाय कोणतीही सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळाले नाही. तर, मार्केट कमिटीतील गाळ्यांची दुरावस्था, पावसाळ्यात दुकानासमोर साठणारी डबकी आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील तुंबलेल्या गटारामुळे पसरणारी दुर्गंधी यांचा रोजचा अनुभव घेत व्यवसाय करावा लागत असल्याचे सत्य समोर येत आहे.