हायलाइट्स:
- करोनाचे संकट अजून टळलेले नाही, असे असतानाही मी मेट्रोच्या कार्यक्रमाला येत असताना मला रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसली आणि ही चिंताजनक बाब आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
- जर लोकांनी असाच मुक्त संचार सुरू केला तर निर्बंध अधिक कडक केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जनतेला दिला आहे.
- जनतेशी काल साधलेल्या संवादात मी निर्बंध उठवण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही; मुख्यमंत्र्यांनी जनतेला करून दिली आठवण.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई मेट्रो २ए आणि मुंबई मेट्रो-७ या दोन मार्गिकांच्या चाचण्यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री करोना आणि निर्बंधांबाबत बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी चाचणीच्या कार्यक्रमाला येत असताना मुंबईतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहिली. ही स्थिती पाहून मी आश्चर्यचकित झालो. हे पाहून काल जनतेशी संवाद साधताना मी चुकून निर्बंध उठवण्याची घोषणा केली की काय असे मला वाटू लागले आहे. पण मी संवादात असे कुठेच बोललेलो नव्हतो. मी कोणतेही निर्बंध उठण्याचा निर्णय घेतलेला नाही. करोनाचा धोका अजून टळलेला नाही. मात्र वाहतूक अशीच वाढत राहिली आणि नागरिकांना मुक्तपणे वावर सुरूच ठेवला तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील.’
क्लिक करा आणि वाचा- अजित पवार यांनी रामदास आठवले यांना केली ‘ही’ विनंती, म्हणाले…
मुख्यमंत्र्यांची आठवलेंवर कोटी
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आठवले यांना केंद्रातून मदत मिळवून देण्याचे आवाहन केली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘रामदास आठवले माझे शेजारी आहेत. आपण राज्याला केंद्राकडून मदत मिळवून देऊ असे आठवले म्हणत आहेत. त्यांनी ही मदत करावीच, पण अजूनही काही ‘आठवले’ तर आणखी सांगतो.’ मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून उपस्थितांमध्ये हशा पिकला.
क्लिक करा आणि वाचा- मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा, भाजपकडून मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने
क्लिक करा आणि वाचा- नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, राज ठाकरेंच्या उपस्थितीत बड्या नेत्याचा मनसे प्रवेश