हायलाइट्स:
- जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशामुळं काँग्रेसमध्ये अस्वस्थता
- शिवसेनेनं राहुल गांधी यांना दिला महत्त्वाचा सल्ला
- भारतीय जनता पक्षाचीही उडवली खिल्ली
वाचा:पन्नाशीनंतर ‘हेरिटेज ट्री’!; ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जाणारे जितीन प्रसाद यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. यूपीतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतराची चर्चा जोरात आहे. त्यावरून काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून यावर भाष्य केलं आहे. जितीन प्रसाद यांचा भाजपमधील प्रवेश हा काही फार मोठा मुद्दा नाही. ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसला फायदा नव्हता व भाजपमध्ये गेले म्हणून भाजपास उपयोग नाही. हे महाशय मनमोहन मंत्रिमंडळात मंत्री होते. नंतर विधानसभा, लोकसभा हरत राहिले. त्यांच्यामुळं भाजपला ब्राह्मण मतं मिळतील असं म्हटलं तर ते ती काँग्रेसला का मिळवून देऊ शकले नाहीत? त्यामुळं प्रसाद यांच्या प्रवेशाचा भाजपनं सुरू केलेला उत्सव मनोरंजक आहे,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.
वाचा: केजरीवाल सरकार दिल्लीत राबवणार ‘मुंबई मॉडेल’
शिवसेना पुढं म्हणते, ‘प्रश्न प्रसाद यांच्या पक्षांतराचा नसून काँग्रेस पक्षातील शेवटचे शिलेदारही आता नौकेवरून टणाटण उड्या मारू लागले आहेत हा आहे. राजस्थान, पंजाबमध्येही काँग्रेसमध्ये असंतोष आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी अलीकडंच २२ आमदारांसह पक्ष सोडला. सचिन पायलटही नाराज आहेत. तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारणे हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
देश उभा करण्यात काँग्रेस राजवटीचं योगदान
‘काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख राष्ट्रीय तसेच विरोधी पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही उत्तम काम केलं. आज देश जो उभा आहे तो घडविण्यात काँग्रेस राजवटीचे योगदान आहे. आजही जगाच्या पाठीवर ‘नेहरू-गांधी’ ही देशाची ओळख पुसता आलेली नाही. मनमोहन सिंग, नरसिंह राव, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा ‘ठसा’ कोणाला पुसता आलेला नाही. हेच काँग्रेसचं भांडवल आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेनं काँग्रेसचं कौतुकही केलं आहे.
वाचा: महाराष्ट्र लसीकरणात सर्वात पुढे; अडीच कोटी नागरिक झाले लसवंत!