हायलाइट्स:
- शरद पवार यांनी व्यक्त केला आहे शिवसेनेवर विश्वास.
- आगामी निवडणुका एकत्र लढण्याचेही दिले संकेत.
- नारायण राणेंनी पवारांच्या वक्तव्याचा काढला वेगळा अर्थ.
वाचा: करोना मृत्यू: चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारवर केला ‘हा’ गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२वा वर्धापनदिन गुरुवारी पार पडला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची स्तुती केली व शिवसेना हा पक्ष कसा विश्वासास पात्र आहे, हे सांगणारे दाखले दिले. पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या वर्धापनदिनी केलेल्या या भाषणावर नारायण राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाष्य केले आहे. ‘शरद पवार यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हटले आहे. शरद पवार असे म्हणाले असले तरी ते कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे’, असा दावा राणे यांनी केला आहे. ‘पवारसाहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो’ असेही राणे म्हणाले.
काय म्हणाले होते शरद पवार?
शिवसेना आणि आपण एकत्रपणे काम करू शकतो, हे कुणाला पटलं नसतं पण ते घडलं आहे. आपण पर्याय दिला आणि तो सगळ्यांनी स्वीकारला आहे. राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार मिळालं असून हे सरकार चांगलं काम करत आहे आणि पुढील पाच वर्षे हे सरकार टिकेल. इतकंच नव्हे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ही आघाडी एकजुटीने लढून देशात आणि राज्यात सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला होता. पवार यांनी शिवसेनेचं यावेळी खास कौतुक केलं होतं. शिवसेनेला महाराष्ट्र कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे, असे नमूद करताना इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार दिला नव्हता याची आठवण पवार यांनी करून दिली. शिवसेनेकडून दिलेला शब्द पाळला जातो हा इतिहास आहे. त्यामुळेच शिवसेना आता घेतलेली भूमिका सोडेल असे कुणी सांगत असेल तर तसे अजिबात होणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
वाचा: वाघाशी मैत्री: संजय राऊत यांचं चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान