हायलाइट्स:
- राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष मिटणार?
- मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट
- सदिच्छा भेट घेत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्यानिमित्तानं गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादाला पूर्णविराम मिळला असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटीआधी शिवसेना सचिन मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच, नार्वेकर यांनीच मुख्यमंत्री व राज्यपालांची भेट निश्चित केली असल्याचंही कळतंय. राज्यपाल व राज्य सरकारमध्ये कटूता असताना मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची ठरत आहे.
राज्य सरकार- राज्यपालांतील वाद काय?
महाविकास आघाडी सरकारकडून ६ नोव्हेंबरला विधान परिषदेसाठीच्या १२ नावांचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून अद्याप राज्यपालांकडून या यादीवर निर्णय झाला नाहीये. माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी काही महिन्यांपूर्वी माहिती अधिकार अंतर्गत राजभवनाकडे १२ आमदारांच्या यादीसंदर्भात माहितीही मागवली होती. अलीकडेच राज्यपाल कार्यालयात उपसचिव प्राची जांभेकर यांनी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर सुनावणी घेतली. वेळी उपसचिव प्राची जांभेकर यांनी राज्यपालांकडे यादीसहीत संपूर्ण माहिती आहे आणि निर्णय झाल्यावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असं सांगितलं आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्यपाल या यादीवर निर्णय घेणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.