Home ताज्या बातम्या राज्यात ४,९५८ गर्भवतींची करोनावर मात

राज्यात ४,९५८ गर्भवतींची करोनावर मात

0
राज्यात ४,९५८ गर्भवतींची करोनावर मात

मुंबई:करोना संसर्गाच्या काळात राज्यातील पाच हजार ६५१ गर्भवती आणि प्रसूत झालेल्या महिलांना करोनाची लागण झाली होती. मात्र, योग्यवेळी वैद्यकीय उपचार आणि आरोग्ययंत्रणेने बजावलेल्या दक्ष कामगिरीमुळे यातील ४,९५८ गर्भवतींनी करोनावर यशस्वी मात केली. १४ जूनपर्यंतच्या करण्यात आलेल्या वैद्यकीय विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.करोनाचा संसर्ग गर्भवती महिलांना झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना जितका मानसिक ताण आला होता, तितकाच तो डॉक्टरांवरही होता. मात्र, अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही या गर्भवती महिलांसह त्यांच्या बाळांना वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.

राज्यात करोनामुळे बाधित झालेल्या गर्भवती महिलांची संख्या ४,४२३ इतकी असून, प्रसूती झाल्यानंतर पुढील सहा आठवड्यापर्यंत बाधित असलेल्या महिलांचे प्रमाण १,२२८ इतके नोंदवण्यात आले आहे. ही आकडेवारी १४ जूनपर्यंतची आहे. करोनावर मात केलेल्या गर्भवती महिलांचे प्रमाण ३,८८० इतके;तर प्रसूती झाल्यानंतरच्या काळात करोनामुक्त झालेल्या महिलांची संख्या १,०७८ इतकी नोंदवण्यात आली आहे. राज्यातील एकूण आकडेवारीमध्ये मुंबईमध्ये करोना झालेल्या गर्भवती महिलांची संख्या सर्वाधिक म्हणजे २,८२२ इतकी;तर प्रसूतीपश्चात बाधित झालेल्या महिलांची संख्या ७९० इतकी होती.

मुंबईत ३,१९२ महिलांची करोनावर मात केली. तर राज्यातील इतर भागांमध्ये नाशिकमध्ये हे प्रमाण ७७ इतके असून ६७ जणींनी करोनावर मात केली आहे. पुण्यात ७३० जणींना करोनाची लागण झाली होती.त्यातील ६४४ महिला करोनामुक्त झाल्या. कोल्हापूरमध्ये हे प्रमाण ३१५ इतके होते.करोनामुक्त झालेल्या महिलांची संख्या येथे ३०४ इतकी नोंदवण्यात आली.नागपूरमध्ये ५७२ जणींपैकी ५१६ जणींनी संसर्गावर मात केली आहे.

पहिल्या लाटेच्या दरम्यान करोनासंसर्ग झालेल्या अनेक गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी अनेक रुग्णालयांनी नाकारले. मुंबईच्या नायर, लो.टिळक रुग्णालयांनी तप्तरेने या महिलांसाठी वेगळ्या वॉर्डची उभारणी केली. पंधराशेहून अधिक महिलांना नायर रुग्णालयामध्ये करोना संसर्गाच्या दोन्ही लाटांच्या वेळी मदत देण्यात आली. योग्य काळजी घेऊन प्रसूती केली, तर आईपासून बाळालाही संसर्ग होण्याची शक्यता अतिशय कमी असते, असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. एम.एम. माणिक यांनी सांगितले.

मृत्यूंचे प्रमाण कमी

राज्याच्या मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी आतापर्यंत करोनामुळे झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करताना केलेल्या अभ्यासामध्ये गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. गर्भवती महिलांमध्ये करोनाच्या विषाणूचे वर्तन कसे असेल, त्यांना लागण झाल्यास संसर्ग किती तीव्र स्वरुपाचा असेल अशा विविध प्रश्नांसंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने चर्चा सुरू होती. एकूण मृत्यू पाहिले तर हे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

आठ नवजात बाळांचा मृत्यू

राज्यात चार आठवड्यांपर्यंत २०३ बाळांना करोनाचा संसर्ग झाल्या होता. त्यापैकी १७८ बाळे करोनामुक्त झाली;तर आठ नवजात बाळांचा मृत्यू झाला. करोना झालेल्या ५४, तर प्रसूती झाल्यानंतर पुढील चार आठवड्यांमध्ये करोना संसर्गामुळे ३३ जणींचे प्राण गेले. मुंबईत सहा बाळांचा आणि ६२ महिलांचा (यात ३९ गर्भवती व २३ प्रसूत झालेल्या महिलांचा समावेश आहे.)

Source link