[ad_1]
गुन्हेगारी जगतावर आधारित दूरदर्शनवर सादर झालेल्या ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘एक शून्य शून्य’, ‘तिसरा डोळा’, ‘परमवीर’ या मराठी तर हिंदीतील ‘करमचंद’ या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. त्यानंतर ‘सीआयडी’, ‘पोलिस डायरी’ या हिंदीत तर मराठीत ‘क्राइम डायरी’, ‘थरार’, ‘लक्ष्य’, ‘अस्मिता’ अशा अनेक मालिका होऊन गेल्या. सध्या हिंदीमध्ये ‘मौका-ए-वारदात’ आणि मराठीमध्ये ‘नवे लक्ष्य’ आणि ‘क्रिमिनल्स : चाहूल गुन्हेगारांची‘, ‘जुर्म और जजबात’, ‘मौका-ए-वारदात’ या मालिकांची चर्चा रंगत आहेत. ‘क्राइम पट्रोल’, ‘सावधान इंडिया’ या मालिकांना तर अनेक वर्षांपासून प्रेक्षकपसंती मिळतेय. या विषयावर मालिका तयार करत असताना खोलवर संशोधन करणारी एक टीम अखंड कार्यमग्न असते.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सगळ्या बाजूंचा विचार करून योग्य पद्धतीने त्या गुन्ह्याची मांडणी करावी लागते. सध्या लॉकडाउनच्या काळात घरातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच टीव्हीचा प्रेक्षकवर्ग असल्याने विशेष काळजी घ्यावी लागत आहे, असं काही जाणकारांनी सांगितलं. याविषयी ‘क्रिमिनल्स : चाहूल गुन्हेगारांची’ या मालिकेच्या लेखिका अनुजा शिंदे यांनी सांगितलं की, ‘लहान मुलांची मानसिकता आणि वय लक्षात घेऊन कथा मांडण्याचं स्वरूप बदलावं लागतंय. या वयात त्यांना सतर्क आणि जागरूक करण्याचं आवाहन करण्यात येतंय. केवळ गुन्हे न दाखवता एकत्र कुटुंबातील जिव्हाळा, नाती दाखवण्याचाही प्रयत्न लिखाणामधून केला जातोय.’
पूर्वी गुन्हेगारी विश्वावर आधारित मालिकांमध्ये सत्यघटनांवर आधारित रुपांतरण दाखवलं जायचं. आता सर्वसामान्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देणाऱ्या, प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या आणि अशक्य वाटणाऱ्या गुन्ह्यांच्या कथा मालिकांमधून पाहायला मिळतात. गुन्ह्यांसंबंधी मालिका लिहीत असताना लेखकांना चांगला गृहपाठ करावा लागतो. या क्षेत्राविषयीची माहिती गोळा करावी लागत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. लेखक अजय ताम्हाणे यांनी सांगितलं की, ‘गुन्हेगारी विश्वाबद्दल लिहीत असताना त्याविषयीची खडानखडा माहिती आणि अभ्यास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विशिष्ट प्रकरणामधील पात्रांच्या संदर्भाप्रमाणे विविध भाषांच्या लहेजामधून लिखाणामध्येही बदल करावे लागतात. त्यासाठीही वेगळा अभ्यास गरजेचा आहे. या प्रकारामध्ये पटकथेची मांडणी चपखल असावी लागते.’ वैविध्यपूर्ण कथांमधून वेगवेगळ्या गुन्ह्यांसंबंधी माहिती देत सध्याचे गुन्हेगारी विश्वावरील कार्यक्रम प्रेक्षकांना सावध करण्याचाच संदेश देत आहेत.
गुन्ह्यांशी संबंधित मालिकांमध्ये सामान्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या खऱ्या घटना असतात. गुन्हा घडण्याची कारणं, गुन्हेगाराची मानसिक स्थिती, बळी पडलेल्या व्यक्तीने केलेल्या चुका या गोष्टी कळाव्यात; तसंच गुन्हा चाहूल देतो ती कशी ओळखायची आणि ओळखली नाही की गुन्हा कसा घडतो, याचा फायदा गुन्हेगार कसा घेतो हे दाखवण्याचा प्रयत्न मालिकेतून होत आहे. मालिका तयार करताना संशोधन आणि अभ्यास करणारे वकील, पत्रकार, मानसोपचारतज्ज्ञ अशा तज्ज्ञांची मोठी टीम पडद्यामागे काम करत असते.
– राकेश सारंग, निर्माते, क्रिमिनल्स: चाहूल गुन्हेगारांची
[ad_2]
Source link