मात्र, ‘याचिकादार सांगतात तेवढी या वास्तूची दयनीय स्थिती नसल्याने मासळी विक्रेते व व्यापाऱ्यांना तात्काळ अन्यत्र हलवण्याची आवश्यकता नाही. त्यांना टप्प्याटप्प्याने हलवले जाणार आहे’, असे पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सांगितले. त्यानंतर ‘मासळी विक्रेत्यांना कशाप्रकारे व कधी हलवले जाणार आहे याचा तपशील पालिकेने प्रतिज्ञापत्रावर द्यावा. त्याचबरोबर तोपर्यंत विक्रेते, व्यापाऱ्यांना कोणताही धोका नाही, हे स्पष्ट करतानाच अनुचित घटना घडल्यास पालिकेचे कोणते अधिकारी जबाबदार असतील, हेही शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर सांगावे’, असे खंडपीठाने सांगितले. मात्र, शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करणे शक्य होणार नाही, असे साखरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खंडपीठाने पालिकेला सोमवारपर्यंतची मुदत दिली.
‘इमारतीची सध्याची स्थिती पाहता कोणतीही अनुचित घटना घडून लोकांचे जीव गेल्यास पालिकेला पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. त्यामुळे ६ जुलैच्या पुढील सुनावणीपर्यंत काहीही अनुचित घडल्यास महापालिकेचे महापौर तसेच संबंधित नगरसेवक व पालिकेचे अधिकारी हे फौजदारी व दिवाणी कारवाईसाठी पात्र ठरतील’, असे खंडपीठाने स्पष्ट केले.