हायलाइट्स:
- महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग
- अधिवेशनाआधी सगळ्या आमदारांना थेट फोन
- आधी व्हिप आता थेट आमदरांना फोन गेल्याने खळबळ
महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आपल्या आमदारांना फोन करून अधिवेशनासाठी हजर राहण्यासाठी सांगितलं आहे. इतकंच नाहीतर अधिवेशन कालावधीत विधानसभा अध्यक्ष निवडणूकीसोबतच पुरवणी मागण्या, विधेयकं मंजुरी यासाठी सभागृहात आपलं बहुमत असावं यासाठी आमदारांशी संपर्क सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अधिवेशनाच्या दिवशी नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, १ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत अध्यक्ष निवडीवरून विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. सध्या करोनाचे संकट कायम आहे. करोनामुळे अधिवेशन दोन दिवसांचे होणार आहे. अधिवेशनाआधी आमदारांचीही करोना चाचणी होणार आहे.
अधिवेशनातच अध्यक्षांची निवड
मुंबईत होणाऱ्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात नवीन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर २०२०च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अद्यापही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही.
‘१२ आमदारांच्या पत्राचे काय झाले?’
पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. तथापि, राज्यपालांना १२ नामनिर्देश आमदारांबाबत दिलेल्या पत्राचे काय झाले? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावरील व्यक्तींनी पदाचा सन्मान राखणे गरजेचे आहे. मात्र, राज्यपालांना त्याचा विसर पडला आहे, असा चिमटा पटोले यांनी काढला.
‘बहुमतापेक्षा जास्त मते मिळतील’
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदारांचे करोना चाचणी अहवाल उपलब्ध झाल्यानंतर नवीन विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निर्णय होईल. आम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू, असा विश्वास कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी व्यक्त केला आहे.