हायलाइट्स:
- लसीकरण मोहिम पुन्हा थंडावली
- लसीचा साठा संपल्यानं खोळंबा
- मुंबई महापालिकेनं दिली मोठी माहिती
केंद्र सरकारकडून लशींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यानं मुंबईत लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेनं ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसंच, लससाठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे व भिवंडी शहरातही लसीचा तुटवडा असल्यानं आज लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे.
ठाण्यात लसीकरण बंद
ठाण्यातील मागणीच्या तुलनेत येणाऱ्या लशींचे प्रमाण कमी असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा लसीकरण बंद करण्याची वेळ ठाणे महापालिकेवर ओढावली आहे. ५ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यासाठी ६० हजार लशी आल्या होत्या. त्यापैकी ठाणे महापालिकेच्या पदरी केवळ १३ हजार २०० लशी आल्या. परंतु गेल्या दोन दिवसांत मागणी करूनही लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहीम थांबवावी लागली आहे.
वाचाः गर्भवतींच्या लसीकरणाचे प्रमाण अद्याप शून्य
भिवंडीत लस संपली
लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ भिवंडी निजामपूर महापालिका प्रशासनावर आली. लस उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील खुदाबक्श हॉल, महापालिका शाळा क्रमांक ७५ भाग्यनगर, मिल्लतनगर नागरी आरोग्य केंद्र, महापालिका शाळा क्रमांक ८५ नवीवस्ती नागरी आरोग्य केंद्र, ईदगाह रोड नागरी आरोग्य केंद्र ही पाचही लसीकरण केंद्रे पुढील सूचना मिळेपर्यंत गुरुवारपासून बंद राहतील, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. यापूर्वीदेखील अनेकदा लशीअभावी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली होती.
वाचाः ईडी करणार सचिन वाझेंची चौकशी; ‘हे’ आहे कारण