हायलाइट्स:
- मुंबईतील ५०० इमारती प्रशासकांकडून बिल्डरांच्या घशात?
- भाजप आमदार आशिष शेलार यांनी टाकला लेटरबॉम्ब.
- एसआयटी मार्फत चौकशी करण्याची केली मागणी.
वाचा:भास्कर जाधव विधानसभेचे अध्यक्ष?; भाजपला शह देण्याचा प्लान ठरला पण…
आशिष शेलार यांनी अनिल काकडे यांना लिहिलेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत. करोना साथीच्या काळात गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणुका न झाल्याचा फायदा घेत मुंबईतील विविध निबंधकांच्या निर्देशानुसार मुंबईतील ५०० हून अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था प्रशासकांनी ताब्यात घेतल्या आहेत. ज्या सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचा कालावधी गेल्या दोन वर्षांत संपत होता त्यांना कोविड महामारी मुळे निवडणुका वेळीच घेता आल्या नाहीत. त्यामुळे यातील बहुतांश सोसायट्यांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. यातील बऱ्याच प्रशासकांनी बिल्डर्सशी संगनमत करून सोसायटी व्यवस्थापन समितीच्या अनुपस्थितीत आणि नियमांचे उल्लंघन करून परस्परपणे सोसायटीच्या पुनर्विकासाचे निर्णय घेतले आहेत. असे सुमारे २ हजार कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पांचे निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळेच रहिवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून फसवणूक झाल्याची भीती त्यांना वाटत आहे, असे शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे.
वाचा: राज्यातील सर्व पोटनिवडणुका अखेर स्थगित; आयोगाने दिले ‘हे’ कारण
लोकशाही पद्धती, प्रस्तावित नियम डावलून प्रशासकांनी बिल्डरांशी संगनमत करून केलेले हे सगळे निर्णय भ्रष्टाचाराची शंका यावी असे असून जनहिताच्या विरोधात आहेत. त्यामुळे सोसायटीच्या प्रशासकांनी सर्वसाधारण सभा किंवा सोसायटी सदस्यांनी निवडलेली व्यवस्थापन समिती शिवाय घेतलेले सर्व पुनर्विकासाचे प्रस्ताव तातडीने स्थगित करण्यात यावेत व लोकशाही पद्धतीने प्रचलित नियमाप्रमाणे निवडलेल्या सदस्यांकडून नव्याने मान्यता घ्याव्यात. प्रशासकांनी ज्या ५०० इमारतींच्या पुनर्विकासाचे जे निर्णय घेण्यात आले आहेत त्याची एसआयटी नियुक्त करून चौकशी करण्यात यावी. ज्या प्रशासकांनी कायद्यांचा भंग करून बिल्डरांशी संगनमत करून निर्णय घेतले त्या प्रशासकांवर एफआयआर दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या आशिष शेलार यांनी केल्या आहेत.
वाचा: दोन डोस घेतलेत त्यांना मुंबईत सवलती?; लोकलबाबत BMCने दिले ‘हे’ उत्तर