गेल्या वर्षी मार्चपासून करोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतरही अत्यावश्यक सेवेसाठी बस सेवा चालवली. पहिल्या टप्प्यात अपुऱ्या सुविधा असतानाही बेस्ट उपक्रमाकडून ही सेवा पुरविण्यात आली. त्यात लोकल सेवा अजूनही मर्यादित प्रमाणात सुरू असल्याने बेस्ट उपक्रमावर प्रचंड भार पडत आहे. बेस्ट बसमध्ये गर्दी उसळत असल्याने फुकटे प्रवासीदेखील वाढले आहेत. गर्दीचा गैरफायदा घेऊन फुकटात प्रवास करता येईल, असा भ्रम असलेल्या प्रवाशांवरील कारवाई अधिक तीव्र झाली आहे.
बेस्टने विशेष मोहीम राबवून फुकट्या प्रवाशांविरोधात दंड वसुली केली आहे. बेस्टमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या तसेच खरेदी केलेल्या तिकिटापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध ही मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत जानेवारी, २०२० ते मे, २०२१ या कालावधीत एकूण २०,२३४ प्रवासी विनातिकीट आढळले असून, त्यांच्याकडून १३ लाख रु. एवढी रक्कम दंडातून वसूल केली आहे.