हायलाइट्स:
- मुंबई पावसाच्या हाहाकारानंतर भाजप आमदार आशीष शेलार यांचे राज्य सरकार आणि महापालिकेवर टीकास्त्र.
- भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी भरले, हा मुंबईला धोक्याचा इशारा तर नाही?- आशीष शेलार.
- मुख्यमंत्र्यांनी तातडीने जनप्रतिनिधी आणि तज्ज्ञांची बैठक बोलावून आढावा घ्यावा- आशीष शेलार.
आमदार आशीष शेलार मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले की, भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही. गेली २५ वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या २५ वर्षात असे कधीच घडले नाही. त्यामुळे हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? याबाबत तातडीने विचार होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
नरबळीचा प्रस्ताव आणणार का?
एवढे सगळे अधिकारी असताना मुंबईत दुर्घटना झाल्याच कशा? असा सवाल करतानाच, दुर्घटना झाल्यानंतर पालिकेत प्रस्ताव होतो. आता नरबळी घेतल्यावर विकासाचे प्रस्ताव करणार आहात का?; असा संतप्त सवाल ही आमदार शेलार यांनी केला केला आहे.
हा राजकारण करायचा मुद्दा नाही. लोककारण करावे लागेल. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने ११२ टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही ३१ लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही, तर हात सफाई आहे, असा आरोपही शेलार यांनी केला. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे, असेही ते म्हणाले. मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग यांचे महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवे होते. पण पालिकेने हे सर्वेक्षण केले नाही. पालिका नागरिकांचे ऐकत नाही. नगरसेवकांचे ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात पाटावर आणून ठेवायचे आहे काय?, असा सवाल करतानाच शिवसेनेच्या पालिकेने हे करून ठेवल्याची टीकाही त्यांनी केली आहे.