Home ताज्या बातम्या Raj Thackeray: महापुरानंतर नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांचा पूर; राज ठाकरेंनी दिला ‘हा’ सल्ला

Raj Thackeray: महापुरानंतर नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांचा पूर; राज ठाकरेंनी दिला ‘हा’ सल्ला

0
Raj Thackeray: महापुरानंतर नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांचा पूर; राज ठाकरेंनी दिला ‘हा’ सल्ला

हायलाइट्स:

  • महापूर ओसरल्यानंतर नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांचा पूर.
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी.
  • पाहणीपेक्षा पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळणे आवश्यक.

ठाणे: ‘राज्यावर पूरसंकट कोसळल्यानंतर केवळ पाहणी दौरे करून उपयोगाचे नाही तर पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत तातडीने मिळणे आवश्यक आहे’, असे नमूद करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्यांच्या पाहणी दौऱ्यावर काहीशी नाराजी व्यक्त केली. ( Raj Thackeray On Maharashtra Flood Relief )

वाचा: तर मनसेत अजिबात प्रवेश करू नका!; राज ठाकरे असं कुणाला म्हणाले पाहा

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा फटका बसला आहे. या भागांत मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत तर अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. या स्थितीतून पूरग्रस्तांना सावरण्यासाठी आता मदतीचा पूर येणे अपेक्षित असून त्यावरच बोट ठेवत राज यांनी नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. पूर ओसरल्यानंतर आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केलं होतं. त्यानुसार पुराचा फटका बसला अशा प्रत्येक गावात आणि प्रत्येक भागात आमचे सैनिक पोहचत आहेत. शक्य होईल तशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ माझा पक्षच नाही तर सगळेच या परिस्थितीत मदत करताहेत. ही चांगली बाब आहे. नुसती पाहणी करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत करणं आता महत्त्वाचं आहे, असे राज यांनी नमूद केले.

वाचा: मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का?; राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर

राज्यातील अनेक भागांना सातत्याने पूरसंकटाला सामोरं जावं लागत आहे. त्यावरून राज यांनी सरकार पातळीवरील अनास्था आणि नियोजनशून्य कारभाराला दोष दिला. आपल्याकडे नियोजनाचा पूर्णपणे अभाव आहे. त्यामुळेच वारंवार पुराचा फटका बसत आहे. संपूर्ण राज्यातच ही स्थिती उद्भवू लागली आहे. नुसत्या वस्त्या वाढत चालल्या आहेत. त्याला कोणताच आकार उकार नाही. या ठाणे शहराचंच उदाहरण घ्या. मी लहानपणी येथे यायचो तेव्हा हे टुमदार शहर होतं आणि आज या शहराची अवस्था काय झाली आहे पाहा. टाऊन प्लानिंग नावाची गोष्टच राहिलेली नाही. याकडे खरंतर सरकारने लक्ष दिलं पाहिजे पण ते दिलं जात नाही. अशी अनास्था असेल तर या गोष्टी थांबणार नाहीत, असे परखड मत राज यांनी मांडले.

वाचा: उद्धव ठाकरे एक दिवस देशाचं नेतृत्व करतील, राऊतांच्या विधानावर पवार म्हणाले…

Source link