Home शहरे मुंबई मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेलं तानसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी तानसा धरण काठोकाठ भरून वाहू लागलं. याअगोदर तुळशी तलाव १२ जुलै रोजी सायंकाळी ७.०० वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला होता. 

शहापूरजवळ असणाऱ्या तानसा तलावातून मुंबईला दर दिवशी सुमारे ४५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो. तानसा धरणाची क्षमता १२८.६२ मीटर टीएचडी इतकी आहे. शहापूर तालुक्यातील तानसा गावात तानसा धरण आहे. मान्सून सुरू झाल्यानंतर जूनमध्ये विशेष पाऊस पडला नव्हता. मात्र जूनच्या अखेरीस पावसाने जोर धरला आणि जुलैमध्येही कोकणसह मुंबईत चांगला पाऊस पडल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी तानसा हा एक तलाव आहे. गेल्यावर्षी तानसा धरण १७ जुलै रोजी सायंकाळी ६.१५ वाजता ओसंडून वाहू लागले होते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची पाणी साठवणूक क्षमता ही एकूण साडेचौदा दशलक्ष लीटर असून आजपर्यंत सातही तलावात ८ लाख ३७ हजार ३९५ लक्ष लिटर्स म्‍हणजेच साधारणतः ५७.८६ टक्‍के पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेने १० टक्के पाणीकपात मागे घेतली होती.