करवीर तालुक्यातील शिये या गावात पंचगंगा नदीचे पाणी पसरते. महापुराच्या या पाण्यामुळे ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांचेही दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या पार्श्वभूमीवर या गावाचे पुनर्वसन करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे माणिक शिंदे यांनी दिला होता. यामुळे आंदोलन झाल्यास ते रोखण्यासाठी पंचगंगा पुलावर पोलीस व अग्निशामक दलाचे जवान उपस्थित होते. तरीही त्यांची नजर चुकवून अनेक नागरिकांनी पंचगंगा नदीत उडी मारली.
या घटनेमुळे पोलिस आणि अग्निशमन जवानांची एकच धांदल उडाली.
‘महापुरात मरण्यापेक्षा नदीत उडी घेऊन जीव देतो’
दरम्यान, पंचगंगा नदीकाठी असलेले शिये गाव वारंवार पुराच्या विख्यात सापडत आहे. परिणामी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या त्रासातून कायमची मुक्तता करण्यासाठी गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी वारंवार ग्रामस्थ करत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर आज ग्रामस्थांनीही आक्रमक आंदोलन केले. महापुरात मरण्यापेक्षा नदीमध्ये उडी घेऊन जीव देतो, अशी भूमिका या आंदोलकांनी यावेळी मांडली.