हायलाइट्स:
- मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
- केंद्रातील बारा मंत्र्यांचे राजीनामे
- काँग्रेसनं साधला निशाणा
‘डॉ. हर्षवर्धन यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याने करोना हाताळण्यात आलेले अपयश व लाखो लोक मरण पावले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त केल्याला जबाबदार असल्याची कबुली मोदी सरकारने दिली आहे,’ अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
‘आपल्या अभूतपूर्व अपयशाचे खापर फोडण्यासाठी काही अजून डोकी सामिल करत आहेत. डळमळीत अर्थव्यवस्था, आकाशाला भिडणारी महागाई, अपमानित होत असलेल्या महिला, बेरोजगारीने लाचार तरुण, आक्रोश करणारे शेतकरी, सीमेवर संकट झेलणारे सैनिक, दहशतवादाचे काश्मीरमध्ये वाढते संकट आणि करोनाची तिसरी लाट आणि भायनक हाहाकाराचे सावट असे अनेक मुद्दे देशासमोर आहेत. असे असताना मंत्रीमंडळ विस्तार हा विषय निरर्थक यासाठी आहे की मुखवटे कितीही बदलले व अवडंबर केले तरी सत्य कसे लपणार? सत्य हेच आहे की हे सरकार केवळ दीड माणसं चालवत आहेत. एक मोदी आणि अर्धे अमित शाह, बाकी केवळ संगीत खुर्ची,’ असा खोचक टोला सावंत यांनी लगावला आहे.
वाचाः नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद; शिवसेना-भाजप दुरावा वाढणार?
‘या मंत्र्यांना नाहीतरी ट्रोलींग शिवाय अधिक काम असणार नाही. त्यामुळे एक खुर्ची आणि अर्ध्या स्टूलवर बसलेल्या मोदी व शाहना आम्ही प्रश्न विचारत राहू. त्यांना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलायला, करोनाच्या तिसऱ्या लाटेविरुध्द लढण्याचे नियोजन करण्यास वेळ नाही. सर्वपक्षीय बैठक बोलवायाला वेळ नाही. पण दलबदलू व सत्तेसाठी हपापलेल्यांसाठी मंत्रीमंडळ विस्ताराचा खेळ अशा संकटकाळी मांडायला वेळ आहे हे स्पष्ट दिसून येते. हाच मोदी सरकारचा खरा चेहरा आहे. मोदी सरकारच्या सत्तेच्या खेळाशी जीवनमरणाचा संघर्ष करणाऱ्या सामान्य माणसाचे कोणतेही घेणंदेणं नाही,’ अशी टीकाही सावंत यांनी केली आहे.
वाचाः खडसेंची प्रकृती बिघडली; चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार का?