Home ताज्या बातम्या Coronavirus In Maharashtra: राज्यात आज ४८३ करोना मृत्यू; बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण का घटतेय?

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज ४८३ करोना मृत्यू; बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण का घटतेय?

0
Coronavirus In Maharashtra: राज्यात आज ४८३ करोना मृत्यू; बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण का घटतेय?

हायलाइट्स:

  • राज्यात आज ४८३ करोना बाधित रुग्णाचा मृत्यू.
  • दिवसभरात १० हजार ४४२ नवीन रुग्णांचे निदान.
  • ७,५०४ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.

मुंबई: नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी, अशी स्थिती गेले काही दिवस राज्यात दिसत आहे. आजच्या आकडेवारीतही ही बाब दिसून आली. आज १० हजार ४४२ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ७ हजार ५०४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. त्यातही चिंता वाढवणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ४८३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात करोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या १ लाख ११ हजार १०४ रुग्णांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )

वाचा: राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; आठ दिवसांनंतर सरकार घेणार मोठा निर्णय

राज्यात करोना पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या निकषांवर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आकडेवारीत बदल दिसू लागले आहेत. नवीन रुग्णांची संख्या अपेक्षित प्रमाणात कमी होत नाहीय तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही घटले आहे. त्याचवेळी मृत्यूंचा आकडा फुगत चालला आहे. आरोग्य यंत्रणेसाठी आणि राज्य सरकारसाठी ही डोकेदुखी वाढवणारी बाब ठरली आहे. ही स्थिती अशीच राहिली व रुग्णसंख्या वाढत गेली तर निर्बंध कडक करावे लागतील, असे संकेत आजच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आजची आकडेवारी हाती आली असून हे आकडेही फारसे समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड लाखाच्या टप्प्यात आली आहे. ही एक काहीसा दिलासा देणारी बाब ठरली असली तरी बाकीचे आकडे चिंतेत भर घालणारे आहेत.

वाचा: मोदींना भेटण्यास मी इच्छूक होतो, पण…; काँग्रेसच्या मंत्र्याची ‘मन की बात’

करोनाची आजची स्थिती

– राज्यात आज ४८३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.८८ टक्के एवढा.
– आज दिवसभरात १० हजार ४४२ नवीन रुग्णांचे निदान.
– ७ हजार ५०४ रुग्ण आज करोनावर मात करून परतले घरी.
– आतापर्यंत एकूण ५६,३९,२७१ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४४ % एवढे.
– आजपर्यंत राज्यात ३,८०,४६,५९० करोना चाचण्या पूर्ण.
– एकूण नमुन्यांपैकी ५९,०८,९९२ (१५.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ९,६२,१३४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये.
– ६ हजार १६० व्यक्ती सध्या संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
– अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार ५८८ पर्यंत घटली.
– राज्यात सर्वाधिक १८ हजार ५७१ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात.
– मुंबई महापालिका क्षेत्रात १८ हजार १६६ रुग्ण घेत आहेत उपचार.
– कोल्हापूर जिल्ह्यात १६,८३५ तर ठाणे जिल्ह्यात १५,९७७ अॅक्टिव्ह रुग्ण.

वाचा:पार्क केलेली कार अचानक बुडाली कशी?; BMCने सांगितलं नेमकं कारण

Source link