[ad_1]
पूर्वीच्या काळातील प्रचलित प्रथांप्रमाणे चांगले मार्क मिळाले म्हणून इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. शेवटच्या वर्षाला असतानाच मी जाहिरात क्षेत्रात कॉपी रायटर आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून नोकरीला लागलो. त्यामुळे इंजिनीअरिंग क्षेत्राशी थेट संबंध फार कमी आला. एकीकडे शाळा-महाविद्यालयीन स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये बक्षीसं मिळाली. पुढे कवयित्री संजीवनी बोकील, संगीता बर्वे, संदीप अवचट यांच्याबरोबर ‘कॅलिडोस्कोप’ नावाचा कार्यक्रम सुरू झाला. त्याचे जवळपास २०० कार्यक्रम आम्ही केले. त्यानंतर माझी ‘दिवस असे की’ नावाची कॅसेट आली आणि त्याकाळी माऊथ पब्लिसिटीवर ती चांगली खपली. मग ‘मी गातो एक गाणे’, ‘कधी हे कधी ते’ , ‘आयुष्यावर बोलू काही’ अशा सगळ्याच कॅसेट्सना रसिकश्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. २००३ मध्ये मी आणि सलीलने मिळून पहिल्यांदा ‘आयुष्यावर बोलू काही’चा कार्यक्रम केला. तो हाऊसफुल्ल झाला. त्यानंतर जगभरात या कार्यक्रमाचे नाटकासारखे दौरे सुरू झाले ते अजूनही थांबले नाहीत.
याच दरम्यान सिनेमासाठी लिहीण्याची संधी मिळाली. ‘चकवा’ या चित्रपटासाठी मी पहिल्यांदा गीतकार म्हणून काम केलं. पण त्यानंतरही भारंभार सिनेमे केले नाहीत. तो प्रवास अजूनही सुरूच आहे. ‘म.टा. सन्मान’सारखे अनेक पुरस्कार गीतलेखनासाठी मिळाले. पण मी माझ्या लिखाणातून सतत काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी कामाचं ‘प्रमाण’ वाढवण्यापेक्षा दर्जा टिकवण्यावर जास्त भर देतो. मी लिहिल्यानंतर ते वाचून मला मजा आली पाहिजे याकडे जास्त कल असतो. मोठ्या माणसांबरोबर काम करण्यापेक्षा उत्तम प्रकल्पांमध्ये ‘चांगलं’ काम करतो याचा आनंद मला जास्त होतो.
मला असं वाटतं उत्कृष्ट लिखाणासाठीची शिकवण वाचन आणि श्रवण ही आहे. आमच्या वेळच्या बालभारतीमधल्या कविता इतक्या सकस होत्या की त्या कवितांमधून वृत्तांची, छंदांची, नवकाव्याची ओळख व्हायची. हे त्या वयात जाणीवपूर्वक कळत नसलं तरी अबोध मनावर त्याचा परिणाम होत असतो. वाचन आणि उदंड ऐकणं यातून कायम संस्कार होत असतात. मी कायम म्हणतो की जो कोणी लिहिणारा आहे त्यानं ९९ वाचावं आणि १ लिहावं. लिहिण्यासाठी उतावीळसुद्धा होऊ नये. कविता आतून स्फुरल्याशिवाय लिहू नये.
जग काय म्हणेल या बंधनात कधीच लिहू नये. तुम्ही किती लिहिता यापेक्षा काय लिहिलंय हे महत्त्वाचं असतं. वाचन आणि श्रवणामधून काही ना काहीतरी सतत मिळतं. विषयाकडे बघायची नजर मिळते, वेगळा दृष्टिकोन मिळतो, शब्द-भाषांची शैली कळते. वाचन हा मुख्यतः माझ्या आनंदाचा भाग असल्याने आणि वाचनासाठी वाचन असल्याने मी वेगवेगळ्या शैलीतलं वाचतो. एकाच विषयाकडे किती वेगवेगळ्या पद्धतीने माणूस बघू शकतो हे शिक्षण वाचन आणि श्रवणातून खूप मोठ्या प्रमाणावर होत असतं. त्यामुळे माझ्या दृष्टीनं हा एक प्रकारे शब्दांचा ‘रियाज’ असतो.
माझ्या लिखाणातला आत्तापर्यंतचा कुठलाच टप्पा बिन महत्त्वाचा वाटत नाही. याचं कारण ती त्या त्या अवस्थेची, वयाची ‘आरसा’ असलेली कविता असते. जे मी दहा वर्षांपूर्वी लिहिलं असेल ते आता लिहिणार नाही हे नैसर्गिक आहे. पण मी त्या वेळी ज्या भाबडेपणाने लिहिलंय तेही तितकंच खरंय. जसजसं तुमचं वय वाढतं तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडत असतात. ते बदल तुमच्या कवितेत उतरतात; किंबहुना ते उतरावेत. अनुभवाने संवेदनांच्या स्तरात बदल होतोच. ‘दिवस असे की’ ही कॅसेट, ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम हे माझ्या आयुष्यातले काही ठळक टप्पे आहेत. पण हे जमिनीवरचे टप्पे झाले. जमिनीच्या आतले झरे जे सदैव वाहताहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ज्यांनी माझे काव्यसंग्रह बारकाईने वाचले असतील त्यांना माझ्यातली ही स्थित्यंतरे जाणवू शकतात.
कविता ही कवीची कधीच नसते. ती त्याला मिळालेल्या, भिडलेल्या अनुभवाची असते. माझ्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी गौण आहेत. मी कविता यश मिळवण्यासाठी कधीच लिहिली नाही. कविता लहानपणापासून माझ्याबरोबर आहे. माझं व्यक्त होण्याचं माध्यम किंवा बोलण्याचं माध्यम म्हणून! ती अजूनही तशीच आहे. ती लोकांना आवडते तेव्हा छान वाटतं इतकंच.
[ad_2]
Source link