Home ताज्या बातम्या MNS: ‘म्हणून मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला; आदित्य शिरोडकर यांनी सांगितली ‘मन की बात’

MNS: ‘म्हणून मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला; आदित्य शिरोडकर यांनी सांगितली ‘मन की बात’

0
MNS: ‘म्हणून मी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला; आदित्य शिरोडकर यांनी सांगितली ‘मन की बात’

हायलाइट्स:

  • मनसे सोडल्यानंतर आदित्य शिरोडकर यांनी मांडली भूमिका
  • उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीचं केलं कौतुक
  • जे काही सुरू होतं, ते पक्षाला दिसत होतं – आदित्य शिरोडकर

मुंबई: मनसेचे युवा नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळं मनसेला धक्का बसल्याचं मानलं जात आहे. आदित्य यांनी हा निर्णय का घेतला याची चर्चा कालपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य शिरोडकर यांनी स्वत:च आपली भूमिका मांडली आहे.

ते मटा ऑनलाइनशी बोलत होते. ‘बाळा नांदगावकर यांच्याशी शाब्दिक चकमक हे एकच मनसे (MNS) सोडण्याचं कारण नाही. त्या वादाला काही कारण होतं. पक्षातील तरुण पदाधिकारी काय करतात? विद्यार्थी सेना महाविद्यालये, विद्यापीठात नेमकं काय काम करते? याबाबत वरिष्ठ नेत्यांनी माहिती घेणं. मार्गदर्शन करणं अपेक्षित असतं. ते आमच्याकडं होत नव्हतं. आमच्या कामाची कुठलीही माहिती न घेता परस्पर मीडियाला जाऊन विद्यार्थी सेना काम करत नाही असं सांगणं हे योग्य नव्हतं. त्यातून आमची शाब्दिक चकमक झाली होती. पण, हे असे वाद होत असतात. मागच्या अनेक वर्षांत असे अनेक प्रसंग आले. माझा निर्णय हा काही काल-परवा झालेला नाही. बाळा नांदगावकर यांच्यासोबत झालेला वाद समोर आला, पण सगळ्याच गोष्टी मला मीडियासमोर सांगता येणार नाहीत. प्रवीण दरेकर, वसंत गिते, शिशिर शिंदे मनसेतून गेली, त्यालाही काही कारणं होती, पण मला त्या खोलात जायचं नाही,’ असं आदित्य शिरोडकर यांनी सांगितलं.

वाचा: भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

राज ठाकरेंशी चर्चा झाली नव्हती!

पक्ष सोडण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होती का? त्यांनी आपली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही का?, असं विचारलं असता आदित्य शिरोडकर यांनी नकारार्थी उत्तर दिलं. ‘माझ्या बाबतीत जे काही होत होतं, ते गुपित नव्हतं. ते पक्षाला दिसत होतं. हे चित्र बदलेल म्हणून मी वाट पाहिली आणि शेवटी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे माझा होता. मी राज ठाकरेंशी चर्चा वगैरे केली नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

वाचा: ‘…म्हणूनच आम्ही म्हणतो हे सगळं मोदींच्या आदेशानं चाललंय’

वडीलही माझ्यासोबत

मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व आदित्य ठाकरे यांची कार्यपद्धत मला भावली. त्यातून प्रेरित होऊनच मी शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला. आता यापुढचं समाजकार्य शिवसेनेत राहूनच करेन. जी जबाबदारी दिली जाईल, ती पार पाडेन,’ असं शिरोडकर यांनी सांगितलं. माझे वडील राजन शिरोडकर हे देखील माझ्यासोबतच शिवसेनेत आलेत. फक्त काल ते आजारी असल्यानं प्रवेशाला उपस्थित नव्हते. येत्या सात ते आठ दिवसांत ते पक्षप्रमुखांची भेट घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

वाचा:‘बेड रिडन’ नागरिकांचं लसीकरण; बीएमसीनं जारी केला ई मेल आयडी

Source link