Home ताज्या बातम्या Mumbai High Court: हे चालणार नाही; इमारत दुर्घटनांवरून कोर्टाचे BMC, सरकारला खडेबोल

Mumbai High Court: हे चालणार नाही; इमारत दुर्घटनांवरून कोर्टाचे BMC, सरकारला खडेबोल

0
Mumbai High Court: हे चालणार नाही; इमारत दुर्घटनांवरून कोर्टाचे BMC, सरकारला खडेबोल

हायलाइट्स:

  • इमारत दुर्घटनांप्रकरणी मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनवणी.
  • मालाड इमारत दुर्घटनेवरून कोर्टाने सुनावले खडेबोल.
  • प्रशासनं अनधिकृत बांधकामांविषयी पुरेशी सजग नाहीत!

मुंबई: ‘कायदे, नियम, तरतुदी सर्व आपापल्या जागेवर आहे. प्रशासने त्याचा आपापल्या पद्धतीने अन्वयार्थ लावतात आणि सरतेशेवटी जीव जातात. हे चालणार नाही’, अशी तंबी आज मुंबई उच्च न्यायालयाने इमारत दुर्घटनांच्या प्रकरणी सुनावणीवेळी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या विविध प्रशासनांना दिली. मुंबई महापालिका व अन्य प्रशासनं अनधिकृत बांधकामांविषयी पुरेशी सजग नाहीत, असे मालाड इमारत दुर्घटना प्रकरणी अहवालातून समोर येत आहे, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. ( Mumbai Malad Building Collapse Latest Updates )

वाचा:गणेशोत्सवाबाबत सरकारची नियमावली जाहीर; ‘इतक्या’ फुटांच्या मूर्तींनाच परवानगी

इमारत दुर्घटनांप्रकरणी आज महत्त्वाची सुनवणी झाली. मालाड इमारत दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती जे. पी. देवधर यांच्या न्यायालयीन आयोगाचा प्राथमिक अहवाल आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. या अहवालावर अनेक निरीक्षणे नोंदवत खंडपीठाने महत्त्वाचे असे निर्देशही दिले. ‘आम्ही अहवाल पाहिला. त्याचा प्राथमिक निष्कर्ष असा की, जुनी एक मजली इमारत होती. ती एकाने विकत घेतली आणि त्याने स्वत:हून तीन मजली केली. मुंबई महापालिकेच्या किंवा अन्य कोणत्याही प्रशासनाच्या मंजुरीविना हे काम झालं. चौकशी आयुक्तांनी याप्रश्नी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारीही निश्चित केली आहे’, असे यातून स्पष्ट होते. ‘या अहवालाचा मुंबई महापालिकेने आणि राज्य सरकारने अभ्यास करावा आणि आमच्यासमोर उपाय मांडावे. पावसाळा सुरू असल्याने आम्हाला आणखी दुर्घटना घडून जीव जावे, असे वाटत नाही. त्यामुळे पुढील शुक्रवारी तुमचा प्रतिसाद आम्हाला मांडावा’, असे निर्देश यावेळी खंडपीठाने दिले.

वाचा: जळगावात भयंकर अपघात! अतिक्रमण काढताना जेसीबीवर कोसळली इमारत

आठ हजारपेक्षा अधिक बांधकामे मालाडमधील त्या परिसरात आहेत आणि त्यापैकी किती अनधिकृत आहेत, हे चित्र अद्याप स्पष्ट नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले असता ‘मालवणी परिसरात ही समस्या आहे. तिथे रहिवाशांनी स्वत:हूनच अनधिकृत मजले उभारले आहेत’, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वकिलांनी हायकोर्टात दिली. त्यावर खंडपीठाने खडेबोल सुनावले. कायदे, नियम, तरतुदी सर्व आपापल्या जागेवर आहे. प्रशासने आपापल्या पद्धतीने अन्वयार्थ लावतात आणि सरतेशेवटी जीव जातात. हे चालणार नाही, असे खंडपीठाने बजावले. राज्य सरकारची प्रशासने व मुंबई महापालिका अनधिकृत बांधकामांविषयी पुरेशी सजग नाही, असे अहवालातून समोर येत असल्याचेही खंडपीठाने नमूद केले.

प्रशासने गंभीर नसल्याने समस्या वाढतेय

‘‘ज्या इमारतीविषयी दुर्घटना घडली त्याच्या मालकाने पूर्वी पहिल्या मजल्याचे बांधकाम विकत घेतले आणि त्याचे कुटुंब वाढल्याने स्वत:हूनच नियोजन प्राधिकरणाच्या परवानगीविना परस्पर बांधकाम वाढवले, असे चौकशी अहवालातून समोर येत आहे. अनधिकृत बांधकामे होत असल्याचे समोर दिसत असूनही मुंबई महापालिका असो, राज्य सरकार असो किंवा अन्य प्रशासने असो, ते त्याकडे काणाडोळा करतात. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईविषयी आणि ते रोखण्याविषयी स्वतंत्र प्राधिकरण असायला हवे, असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे’’, असेही खंडपीठाने निदर्शनास आणले. तसेच सरकारी प्रशासने याप्रश्नी पुरेसे गंभीर नसल्याने ही समस्या वाढत आहे, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. चौकशी अहवालाच्या अनुषंगाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला शुक्रवारी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देशही देण्यात आले.

वाचा: पुणे: ‘आंबिल ओढा झोपडपट्टीवरील कारवाईमागे भाजपचे हितसंबंध’

Source link