हायलाइट्स:
- ‘या’ भाजप नेत्याचा मोदींपेक्षा गडकरींच्या नेतृत्वावर अधिक विश्वास
- पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणं व्यर्थ
- करोना युद्धाची सूत्रं नितीन गडकरींवर सोपवावीत : सुब्रमण्यम स्वामी
- ‘नितीन गडकरीचं का?’ या प्रश्नालाही स्वामी यांनी उत्तर दिलंय
‘भारतानं इस्लामिक आणि ब्रिटिश घुसखोरांचाही सामना केलाय, तसंच देश करोनाशी दोन हात करेल. योग्य पावलं उचलली गेली नाहीत तर आपल्याला करोनाच्या आणखीन एका लाटेचा सामना करावा लागू शकतो, यामध्ये लहान मुलांना अधिक धोका उद्भवू शकतो. अशावेळी पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणं व्यर्थ आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धाची जबाबदारी नितीन गडकरींना सोपवावीत’, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं ट्विट
करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सरकारी यंत्रणा फोल ठरत असल्याची चर्चा आहे. अनेक गैर-भाजपशासित राज्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर अशा कठीण प्रसंगी राज्या-राज्यांत दुजाभाव करण्याचाही आरोप केला आहे. अशावेळी सुब्रमण्यम स्वामी यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.
‘नितीन गडकरीचं का?’
भारतीय जनता पक्षाचेच राज्यसभा खासदार असलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी केलेल्या या ट्विटमुळे एका वेगळ्याच चर्चेला सोशल मीडियावर तोंड फुटलंय. स्वामींच्या या ट्विटवर एका युझरनं ‘नितीन गडकरीचं का?’ असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांना केला. याचंही उत्तर स्वामींनी दिलंय.
कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या मजबूततेची आवश्यकता आहे. यामध्ये नितीन गडकरी यांनी स्वत:ला सिद्ध केलंय, असं उत्तर देत सुब्रमण्यम स्वामी यांनी नितीन गडकरींच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केलाय.
टीकेला प्रत्यूत्तर
पंतप्रधान कार्यालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर अर्थातच सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर काहींनी टीकाही केली. यावर, ‘पंतप्रधान कार्यालय हा एक विभाग आहे, पीएमओ म्हणजे खुद्द पंतप्रधान नाहीत’ असं स्पष्टीकरण स्वामींनी दिलंय.