Home अश्रेणीबद्ध Pimpri: महापालिका दहा दिवसांत धोकादायक इमारती; संरक्षण भितींचा ‘सर्व्हे’ करणार

Pimpri: महापालिका दहा दिवसांत धोकादायक इमारती; संरक्षण भितींचा ‘सर्व्हे’ करणार

पिंपरी-चिंचवड शहरात 57 बांधकामे धोकादायक असून त्यापैकी 31 बांधकामांची डागडुजी केली आहे. तीन अतिधोकादायक बांधकामे महापालिकेने पाडली आहेत. तर, उर्वरित बांधकामाची डागडुजी करण्याची सूचना केली आहे, अशी माहिती सह शहर अभियंता राजन पाटील यांनी दिली. तसेच सिमाभिंतीलगत, झाडाच्याखालील कामगारांच्या वसाहती सुरिक्षत ठिकाणी हलविण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील बांधकामे, संरक्षण भिंत, रिटेनिंग भिंत, इमारत बांधकामे याबाबत काही धोकादायक स्थिती आहे का? याचा बीट निरीक्षकांमार्फत 10 दिवसात ‘सर्व्हे’ केला जाणार आहे. धोकादायक बांधकामे आढळल्यास तातडीने विकसक, सोसायटीधारकांना धोका नष्ट करण्याच्या सूचना केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील कोंढव्यात संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. तर, आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाची संरक्षक भिंत कोसळून सहा मजूर ठार झाले आहेत. पावसाळ्यात शहरातील संरक्षण भिंत पडण्याच्या घटना घडू नयेत त्यापार्श्वभूमीवर पिंपरी महापालिकेने उपाययोजना केल्या आहेत. त्याची माहिती सह शहर अभियंता राजन पाटील यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, शिरीष पोरेड्डी, उपअभियंता विजय भोजने उपस्थित होते.

  • पाटील म्हणाले, महापालिकेच्या ‘अ’ प्रभागात 22, ‘ब’ मध्ये 10, ‘क’ 3, ‘ड’ 4, ‘इ’ 3, ‘फ’ 3 आणि ‘ग’ प्रभागात 12 अशी 57 बांधकामे धोकादायक आहेत. त्यापैंकी 31 लोकांनी डागडुजी केली आहे. तीन अतिधोकादायक बांधकामे महापालिकेने पाडली आहेत. तर, उर्वरित लोकांना बांधकामांची डागडुजी करण्याची सूचना केली आहे.

महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आलेले, सुरु असलेली बांधकामे, पुर्ण झालेली बांधकामांची बीट निरीक्षक पाहणी करणार आहेत. संरक्षण भिंत, रिटेनिंग भिंत, इमारत बांधकामे धोकादायक आहेत काय? हे तपासले जाणार आहे. त्याबाबतचा अहवाल 9 जुलैपर्यंत बीट निरीक्षकांना देण्याच्या सूचना केल्या आहेत. धोकादायक बांधकाम आढळल्यास तातडीने विकसक, सोसायटीधारकांना पाडण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यांनी नाही पाडल्यास महापालिकेकडून धोकादायक बांधकामावर कारवाई केली जाईल.

  • क्रेडाई पुणे मेट्रो आणि मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन यांना देखील पत्र पाठविले आहे. पावसामुळे, अतिवृष्टीमुळे होणा-या नुकसानीची खबरदारी घेण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना विकसकांना देण्याचा त्यांना सांगितले आहे. सिमाभिंतीलगत, नाल्याच्या बाजूस, झाडाखाली कामगारांच्या वसाहती असल्यास त्या त्वरित सुरक्षित ठिकाणी हलविण्यात याव्यात. धोकादायक बांधकामे पाडावीत. बांधकामांच्या मिळकतींमध्ये साठणा-या पावसाच्या निच-याचे योग्य ते नियोजन करावे. खड्यात, रस्त्यावर पाणी साठून रहदारीस अडथळा होणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पाटील म्हणाले, विकसक गृह प्रकल्पाचे डिझाईन नामांकित आर्किटेक्टकडून करुन घेतात. परंतु, गृह प्रकल्पातील संरक्षक भिंत, रिटेनिंग भिंत, सुरक्षारक्षकांची केबीन, कार्यालय, पाण्याची टाकी, कल्ब हाऊस याचे व्यवस्थित डिझाईन करुन घेतले जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात अशी बांधकामे पडून जीवीतहानी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

  • यापुढे बांधकाम पुर्णत्वाचा, भाग पुर्णत्वाचा दाखला देताना इमारतीचे स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी सर्टिफिकेट घेणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर गृहप्रकल्पातील सर्व बांधकाम डिझाईननुसार केलेल्या हमीपत्र घेण्यात येणार आहे. त्याशिवाय बांधकाम पुर्णत्वाचा दाखला दिला जाणार नाही. शहरात धोकादायक इमारत, बांधकाम, संरक्षक भिंत असल्यास नागरिकांनी महापालिकेला कळवावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.