Home बातम्या राष्ट्रीय Pravin Darekar: पंढरपूरच्या निकालाबाबत दरेकर यांनी केला ‘हा’ मोठा दावा

Pravin Darekar: पंढरपूरच्या निकालाबाबत दरेकर यांनी केला ‘हा’ मोठा दावा

0
Pravin Darekar: पंढरपूरच्या निकालाबाबत दरेकर यांनी केला ‘हा’ मोठा दावा

हायलाइट्स:

  • पंढरपूर मंगळवेढ्यात सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त करणारा कौल.
  • विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा दावा.
  • मतदारांनी भावनेपेक्षा विकासासाठीच मतदान केले.

नगर: ‘एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यावर होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटुंबातीलच सदस्य निवडून येतो. महाराष्ट्रात आजवर तसेच चित्र पहायला मिळाले आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ मात्र याला अपवाद ठरला आहे. तेथील मतदारांनी भावनेपेक्षा विकास आणि सध्याची परिस्थिती पाहून सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त करणारा कौल दिला आहे,’ अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. ( Pravin Darekar On Pandharpur By Election Result )

वाचा: ‘त्या’ विकासाने तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही!; मुख्यमंत्र्यांचा टोला

प्रवीण दरेकर मंगळवारी अहमदनगर येथे आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी करोना संबंधीच्या उपाययोजनांची आढावा बैठक घेतली. नगर जिल्हा आणि शहरातील उपाययोजनांसंबंधी त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार बबनराव पाचपुते, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर, शहराध्यक्ष भैय्या गंधे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वाचा: बाळासाहेब थोरात यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; पत्रकारांसाठी केली ‘ही’ विनंती

दरेकर म्हणाले, ‘संकटाच्या काळात कोणीही राजकारण करता कामा नये. केंद्र व राज्य सरकारने एकत्रित काम केले पाहिजे. परंतु प्रत्येक वेळेला आपले अपयश झाकण्यासाठी कुठल्याही गोष्टीत केंद्रावर टीका केली जात असल्याचे दिसून येते. ते योग्य नाही. आपल्या राज्यात ऑक्सिजनचा १,७५० टन साठा मिळत आहे. सर्वाधिक चार लाख ३५ हजार रेमडेसिवीर मिळत आहेत. एवढे असूनही केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले, ते तेवढी लस मिळाली म्हणूनच झाले ना? त्यावरून टीका करण्यात काय अर्थ आहे? यामध्ये राज्याचीही जबाबदारी आहे. केंद्र सरकारसोबत समन्वय ठेवून जेवढे सलोख्याचे वातावरण ठेवले जाईल, तेवढ्या जास्त सुविधा आपल्याला मिळतील. मात्र, आपल्या यंत्रणा सक्षम करण्यात आपण कमी पडलो म्हणून केंद्राकडे बोट दाखविणे बरोबर नाही.’

अभिनेत्री कंगना राणावतचे ट्वीटर अकाउंट निलंबित केल्याच्या विषयावर ते म्हणाले, ‘याबद्दल आपल्याकडे अधिक माहिती नाही. त्यांचे आकाऊंट कशासाठी निलंबित केले, हे ठावूक नाही. त्याची नेमकी माहिती उपलब्ध झाल्यावरच यावर बोलता येईल.’

वाचा: करोनाची दुसरी लाट ओसरतेय!; ‘या’ जिल्ह्यात रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर

Source link