Home ताज्या बातम्या Uddhav Thackeray: म्हणून हा गोवर्धन पेलणे शक्य झाले; CM ठाकरेंचे डॉक्टरांना विशेष पत्र

Uddhav Thackeray: म्हणून हा गोवर्धन पेलणे शक्य झाले; CM ठाकरेंचे डॉक्टरांना विशेष पत्र

0
Uddhav Thackeray: म्हणून हा गोवर्धन पेलणे शक्य झाले; CM ठाकरेंचे डॉक्टरांना विशेष पत्र

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर दिनानिमित्त लिहिलं विशेष पत्र.
  • डॉक्टरांमुळे कोविड लढ्याचा गोवर्धन पेलता आला.
  • या सेवेसाठी महाराष्ट्र आपला सदैव कृतज्ञ राहील.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ जुलै या राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त राज्यातील सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे आहे, असे नमूद करत डॉक्टरांमुळेच कोविड विरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे शक्य झाले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ( Uddhav Thackeray On National Doctors Day )

वाचा: करोना: राज्यात आज ९,७७१ नव्या रुग्णांचे निदान, बरे होणारे रुग्ण अधिक

सर्व डॉक्टरांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, मागील वर्ष दीड वर्षापासून आपण सगळे करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उतारावर उभे आहोत. आज काही प्रमाणात संसर्गाचे प्रमाण कमी झालेले दिसत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारीही अधिक वाढली आहे. आजपर्यंत कोविडचा लढा आपण लढलो ते तुम्हा डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या योद्ध्यांमुळे आणि पुढे देखील हे आव्हान आपण पेलणार आहोत ते आपल्याच भक्कम साथीने असा विश्वास मला आहे.

कोविड महामारी ही रोज घडणारी गोष्ट नसते. अशा घटना, अशी महामारी कित्येक वर्षांतून एकदा येते आणि तिच्याशी झुंजताना तुमचा माझा सगळ्यांचा कस लागतो. सीमेवरील युद्ध वेगळं असतं. तिथं शत्रू आपल्या समोर असतो पण कोविड सारख्या रोगराईविरुद्धचे युद्ध ही वेगळी गोष्ट आहे. इथे शत्रू डोळ्यांना दिसत नाही अशा स्थितीत लढाई लढावी लागत आहे. रुग्णांचे सर्वेक्षण, प्रयोगशाळेतील चाचण्या, रुग्णांवरील उपचार या साऱ्या बाबी जीवाची बाजी लावून आपण सारे करीत आहोत कारण हा अदृश्य शत्रू कधी कोणावर झडप घालेल हे सांगता येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.

वाचा: चौकशी, अटकही भाजपच करणार का?; ‘त्या’ मागणीवरून राष्ट्रवादीचा संताप

कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आघाडीचे योद्धे म्हणून आपण सर्वांनी जे मोलाचे योगदान दिले आहे, ते शब्दातीत आहे. मी मधल्या काळात आपणाशी वेगवेगळ्या निमित्ताने संवाद साधला आहे. आपल्या सूचना देखील ऐकून घेतल्या आहेत. डॉक्टर, मग ते सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणारे असोत की खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारे असोत, प्रत्येकाने जीवाची बाजी लावून आलेल्या प्रत्येक रुग्णाला जीवदान देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. महाराष्ट्र ही लढाई तुमच्याशिवाय लढू शकत नव्हता आणि लढू शकणार नाही, अशा भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या

कोविडविरुद्धच्या या लढाईमध्ये अनेक डॉक्टरांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. आपले कुटुंबीय गमावले आहेत. घरातील जीवलग व्यक्ती कोविडमध्ये मृत्युमुखी पडल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा आपल्या रणांगणात, आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी रुजू झालेले डॉक्टर मी पाहिले आहेत. महिना महिना घराकडे पाठ फिरवून निव्वळ रुग्णसेवेला वाहून घेतलेले डॉक्टर मी पाहिले आहेत. हे सगळे शब्दांत मांडता येणार नाही. या कठीण काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेला तुम्ही जो मोलाचा आधार दिला आहे, त्याबद्दल महाराष्ट्र आपला सदैव कृतज्ञ राहील, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

वाचा: विधानसभाध्यक्षपद: ‘मविआ’च्या संख्याबळावर राष्ट्रवादीचा मोठा दावा

तुमच्या हाताला संजीवन स्पर्शाची जादू रोज गवसावी आणि तुमच्या हातून असंख्य जीव बरे व्हावेत, हीच माझी अपेक्षा आहे आणि म्हणूनच आज तुमचे आभार मानताना तुम्हाला एक विनंती मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने करणार आहे. कोविड विरुद्धचे हे युद्ध अजून संपलेले नाही, हे आपण जाणताच आणि म्हणून येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे आहे. तुम्ही छोट्याशा खेडेगावात काम करत असा की मोठ्या सुसज्ज हॉस्पिटल मध्ये, तुम्ही सगळेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. तुम्ही घरगुती विलगीकरणातील रुग्णाला सल्ला देत असाल किंवा आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या गंभीर रुग्णाला वैद्यकीय कौशल्य पणाला लावून वाचवत असाल, तुमची प्रत्येक कृती या राज्याला आणि या राज्याच्या प्रत्येक नागरीकाला कोविडच्या विळख्यातून वाचविण्यासाठी महत्त्वाची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोविड उपचार सुरू असतानाही राज्यातील डॉक्टरांनी तितक्याच आत्मीयतेने नॉन कोविड उपचार, जसे बाळंतपणे, मेडिकल इमर्जन्सी, बालकांचे आजार यावरही उपचार दिले आहेत. ही बाबसुद्धा निश्चितच कौतुकास्पद आहे. कोविड काळात देवळे आणि धार्मिक स्थळे बंद होती मात्र डॉक्टरच्या रूपाने देवदूत आपल्यात होते अशी माझी भावना आहे. या डॉक्टर्सचा पूर्ण सन्मान करणे आणि त्यांच्या प्रती आदर बाळगणे, त्यांच्या बाबतीत कुठलीही हिंसात्मक कृती होऊ नये याची सर्वानी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

वाचा: अजित पवारांच्या अडचणी वाढवणार?, CBI चौकशीसाठी थेट अमित शहांना पत्र

Source link