केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनीअरिंग सेवेची परीक्षा रविवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र मुंबई आणि परिसरात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा बंद झाली तसेच अनेक भागात पाणी साचल्याने उमेदवार केंद्रावर पोहचू शकले नाहीत. यामुळे उमेदवारांना परीक्षेविना राहावे लागले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने रविवारी इंडियन इंजिअनीअरिंग सेवेच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुंबईतील काही केंद्रावरही परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्रभर मुंबईला पावसाने झोडपून काढले. यामुळे अनेक भागात पाणी साचले तर रेल्वेसह अन्य सार्वजिनक वाहतुकही खोळंबली होती. यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला पोहचू शकले नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. याबाबत युवासेनेचे प्रदीप सावंत, महादेव जगताप, राजन कोळंबेकर यांनी शिवसेनेचे राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांना पत्र लिहून केंद्रासरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावरूनही व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे.