Home ताज्या बातम्या Valentine Day विशेष – लपून छपून प्रेम कशासाठी?

Valentine Day विशेष – लपून छपून प्रेम कशासाठी?

0

प्यार किया तो डरना क्या…
जब प्यार किया तो डरना क्या..
प्यार किया कोई चोरी नहीं की….


सन १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटातील शकील बदायुनी यांनी लिहिलेलं ही गीत अजरामर झाले. साठ वर्षांनंतरही हा चित्रपट आणि त्यातील हे गाणं अवीट असंच आहे. चित्रपटातील नायक-नायिका जशी एकमेकांच्या प्रेमात पडले, तशी आजच्या जमान्यात कोणी ना कोणी प्रेमात पडतोच. प्रेमाशिवाय जग नाही आणि प्रेमाने जग जिंकता येतं, असं म्हटलं जातं ते अगदी खरं.

गीतकार म्हणतो, प्रेम करणं काही चोरी नव्हे, मग का घाबरायचं? तुमचे प्रेम सच्चे असेल तर समाज काही म्हणो; आपण प्रेम करायला घाबरायचं नाही, असं गीतकाराला सुचवायचं आहे. तुमचं प्रेम नि:स्वार्थी, पवित्र आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढवणारंच असेल आणि भावनिक, शारीरिक आकर्षणाच्या पलीकडचं नातं जोपासणारं असेल तर समाज काहीही म्हणो; त्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं. परंतु केवळ भावना, वासना यालाच प्रेम म्हणणार असाल तर मात्र सावध राहिलंच पाहिजे. तरुणी असो व तरुण; त्यांनी प्रेम करण्यापूर्वी हजार वेळा या गोष्टीचा विचार करून अत्यंत कठोर परीक्षा घेऊनच आपल्या मित्राची निवड करायला हवी.

निखळ मैत्रीच्या रूपानं एकत्र येणं किंवा त्यानंतर वैवाहिक नातं जोडणं या साऱ्या प्रक्रिया कसोटीच्या पातळीवर तपासून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे आयुष्यात फसगत होण्याचा धोका नसतो. आजकाल बरेच तरुण-तरुणी चोरी-छुपके प्रेम करायला जातात. त्यात आकर्षणाचा भरणा अधिक असतो. त्यामुळे आपण फसवणुकीचे प्रकार घडताना पाहतो. त्यामुळे सावधान, प्रेम करताना काळजी घेणे केव्हाही चांगलं.

मनाची पक्की खात्री झाल्याशिवाय प्रेमाला होकार नको. आयुष्यात चांगल्या विश्वासू मित्राची, जोडीदाराची निवड करायची असेल तर त्याची परीक्षा घ्यायलाच पाहिजे. भाजी घेताना मोजून, निरखून, पारखून घेत असू तर मित्र, जोडीदार पारखायला नको का ?