हायलाइट्स:
- भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’वर राष्ट्रवादीचा पलटवार
- सरकार पुढील २५ वर्ष चालणार असल्याचा केला दावा
- चंद्रकांत पाटलांनी माफी मागण्याचीही केली मागणी
‘राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचं हे सरकार पुढील २५ वर्ष चालेल,’ असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
‘चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळ यांची माफी मागावी’
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रकरणात जून महिन्यात कोर्टात विचारणा याचिका दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच भुजबळ हे जामिनावर बाहेर असल्याने त्यांनी जपून बोलावं, असा इशाराही पाटील यांनी दिला. या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
‘ईडी, सीबीआय आणि एनआयए यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या खिशात आहेत. ते हवं तेव्हा कोणाचीही चौकशी लावतात. मात्र आता न्यायालयेही त्यांच्या खिशात गेली की काय, अशी शंका येण्यासारखं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे,’ असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांनी आयपीएस अधिकारी परमवीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांच्यावर निशाणा साधला आहे. परमवीर सिंह यांच्यावर हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही मुश्रीफ यांनी केली.