नाशिक, दि. २२ जुलै (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत आहे. अशाप्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवित प्रशासनाने लाभार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कसबे वणी (ता. दिंडोरी) येथील यश लॉन्समध्ये आज सकाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री झिरवाळ बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा उपनोंदणी महानिरीक्षक नीलेश जाधव, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे (प्रशासन), उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे (दिंडोरी), शिवाजीराव गवळी (पेठ) भाऊलाल तांबडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिबिरात एकूण तीन हजार ५४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

मंत्री झिरवाळ म्हणाले, राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होत आहे. आगामी काळातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील. नागरिकांनीही अशा उपक्रमांना उपस्थित राहून पात्र योजनांचा लाभ घ्यावा. या शिबिरानिमित्त विविध विभागांनी स्टॉल मांडले होते. त्यांना मंत्री झिरवाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच स्टॉल चालकांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसिलदार मुकेश कांबळे यांनी समाधान शिबिराचा उद्देश विशद केला.

या शिबिरात पंचायत समिती, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख, कृषी विभागाने योजनांची माहिती देणारे स्टॉल मांडले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
००००





















WhatsApp