मुंबई, दि.६: राज्यातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाविषयीची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांतून प्रसारित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या उपक्रमाच्या विविध पैलूंवर पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

या विशेष मुलाखतीत ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ची संकल्पना, उद्दिष्टे, गटशेतीचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरील पीक नियोजन तसेच महाराष्ट्राच्या शेतीचे भविष्य या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत सामूहिक नियोजन, शाश्वत शेती आणि तंत्रज्ञानाधारित शेतीचा स्वीकार करावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचेही श्री. भटकळ यांनी मुलाखतीत स्पष्ट केले आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ती उपलब्ध होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत ९ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका पूनम चांदोरकर यांनी केले आहे.
या मुलाखतीत राज्यातील १८ हजार शेतकरी गटांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा विस्तार, गटशेतीची संकल्पना, उत्पादनवाढ आणि खर्चबचतीतील संभाव्य परिणाम, महिला शेतकरी गटांचा सहभाग, तसेच कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय यांचा आढावा घेण्यात आला आहे. याशिवाय स्मार्ट शेती ॲप, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रशिक्षित मेंटर्स, जलसंधारण, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरील नियोजन, ग्रामीण तरुणांचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या शेतीसाठी पुढील पाच ते सात वर्षांचे व्हिजन या विषयांवरही या मुलाखतीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
०००
जयश्री कोल्हे/स.सं.



















WhatsApp