
मुंबई, दि. ९ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावळदबारा हे राखीव वनक्षेत्र आहे. जाळीचा देव ते सावळदबारा गाव रस्त्याचा विकास करण्यासह मौजे टिटवी येथील कालिंका देवी मंदिर व परिसराची विकासकामे निसर्ग पर्यटन योजनेतून करण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
जाळीचा देव ते सावळदबारा गाव रस्ता वन विभागाच्या जागेतून विकसित करणे तसेच कालिंका देवी मंदिर परिसराच्या विकासासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत वनमंत्री श्री. नाईक बोलत होते. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वनमंत्री श्री. नाईक म्हणाले की, ऐतिहासिक वास्तूंचे जतन तसेच ऐतिहासिक मंदिरांच्या परिसराचा विकास करण्यात यावा. आवश्यकतेनुसार पर्यायी जागाही उपलब्ध करून द्यावी.
जाळीचा देव ते सावळदबारा हा रस्ता अजिंठा-बुलढाणा राज्य महामार्गाला जोडलेला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी वन विभागाच्या नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही वनमंत्री श्री. नाईक यांनी दिले.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ

WhatsApp