टीबीमुक्त मुंबईसाठी जनजागृतीला गती देण्याचे राज्यपालांचे आवाहन – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ११: मुंबई महानगर आणि परिसराची लोकसंख्या सुमारे दोन कोटी असून लोकसंख्येची घनता मोठी असल्याने सार्वजनिक ठिकाणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक जनजागृती, वेळेवर निदान आणि पूर्ण उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.

    राज्यपाल देव वर्मा यांच्या पुढाकाराने तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून टीबीमुक्त मुंबई अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत राज्यपालांच्या उपस्थितीत अन्सारी नगर कुर्ला येथील अण्णा लीला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. महाविद्यालयाच्या १२०० विद्यार्थ्यांनी या जनजागृती फेरीत सहभाग घेतला.

    राज्यपालांच्या हस्ते टीबीमुक्त भारत या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना क्षयरोग जनजागृतीची प्रतिज्ञा देण्यात आली.

    टीबीमुक्त मुंबई अभियान जनजागृती फेरीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे, बंट संघ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्टी, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, अण्णा लीला महाविद्यालयाचे प्राचार्य हिरेन दंड तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

    टीबी हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसून सामाजिक आणि आर्थिक आव्हानदेखील आहे. आजच्या प्रगत वैद्यकीय विज्ञानामुळे टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. आजाराचे वेळेवर निदान होऊन रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे आणि पूर्ण उपचार घेतल्यास तो पूर्णपणे निरोगी होऊ शकतो, असे राज्यपालांनी सांगितले.

    टीबीबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आणि अनावश्यक भीती आहे. सामाजिक कलंकाच्या भीतीमुळे अनेक जण वेळेवर तपासणी करून घेत नाहीत किंवा उपचार मधेच थांबवतात. यामुळे रुग्णाचे आरोग्य धोक्यात येण्याबरोबरच संसर्ग इतर व्यक्तींपर्यंत पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे टीबीच्या रुग्णांशी भेदभाव न करता त्यांना सहानुभूती, सहकार्य आणि सन्मानाची वागणूक देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

    मुंबईच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये विशेष जनजागृती करणे आवश्यक आहे. वेळेवर मिळणारी योग्य माहिती, निदान आणि उपचार हे टीबीचा प्रसार रोखण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    ही सामुदायिक पदयात्रा केवळ प्रतीकात्मक कार्यक्रम नसून समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. नागरिक स्वतः पुढाकार घेऊन जनजागृतीमध्ये सहभागी झाले, तर त्याचे रूपांतर व्यापक लोकचळवळीत होऊ शकते. या पदयात्रेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांपर्यंत ‘टीबीला घाबरू नका, वेळेवर तपासणी करा आणि पूर्ण उपचार घ्या’ हा संदेश पोहोचेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

    केंद्र सरकारने निश्चित केलेले ‘टीबीमुक्त भारत’ हे उद्दिष्ट केवळ सरकारचे अभियान नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका बजावणे आवश्यक आहे. विशेषतः तरुणांनी आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजामध्ये टीबीविषयी अचूक माहिती पोहोचवावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

    तरुणांनी टीबीमुक्तीच्या यशोगाथांवर आधारित लघुपट, पोस्टर्स, पॉडकास्ट आणि सोशल मीडिया मोहिमा तयार करून जनजागृतीला नवे माध्यम द्यावे, असेही राज्यपालांनी सुचविले. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना हे या अभियानातील परिवर्तनाचे महत्त्वाचे दूत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

    सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अभियानामागची भूमिका स्पष्ट केली. कुलगुरु रवींद्र कुलकर्णी तसेच बंट संघ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ शेट्टी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

    ००००

    - Advertisement -