Home ताज्या बातम्या तांत्रिक अडचणींमुळे मृत्यूंची संख्या प्रलंबित

तांत्रिक अडचणींमुळे मृत्यूंची संख्या प्रलंबित

0
तांत्रिक अडचणींमुळे मृत्यूंची संख्या प्रलंबित

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

‘करोनाची रुग्णसंख्या व मृत्यू यांची माहिती लपविण्याचा कोणताच प्रश्न नसून, केवळ तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा ही माहिती प्रलंबित राहते,’ असा खुलासा राज्याच्या आरोग्य विभागाने केला आहे. त्याचबरोबर गेल्या पंधरा दिवसांत यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ५३२५ मृत्यूंऐवजी प्रत्यक्षात ८०७४ मृत्यू झाल्याची माहिती अद्ययावत केल्याचेही कळविले आहे.

राज्यातील करोना मृत्यूसंख्येबाबत जिल्हा आणि राज्य सरकारच्या आकड्यांत यामध्ये ११ हजार ६१७ मृत्यूंचा फरक असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सरकारी यंत्रणा वेगाने कामाला लागली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: या विषयात लक्ष घातले आहे. या वृत्तानंतर महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही मृत्युसंख्येची सुधारित आकडेवारी जाहीर करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर २६ मे ते १० जून या काळात राज्यातील एका आठवड्यापूर्वीच्या कालावधीतील ८०७४ मृत्यूंची दखल राज्याच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात घेण्यात आली आहे. या प्रक्रियेतील अडचणींबाबतही आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. २६ मे ते १० जून या कालावधीमध्ये या पूर्वी ५३२५ मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता मात्र त्यामध्ये ताळमेळ घालून या कालावधीत प्रत्यक्षात ८०७४ मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

‘करोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांकडून ‘आयसीएमआर पोर्टल’वर रुग्णसंख्येबाबत माहिती मागविण्यात येते, तर रुग्णालयांकडून ‘फॅसिलिटी अॅप’द्वारे बरे झालेले रुग्ण व मृत्यूंबाबत माहिती भरून घेण्यात येते. मात्र, अनेक रुग्णालये, विशेषत: खासगी रुग्णालये या अॅपवर माहिती वेळेत अद्ययावत करीत नसल्याने मृत्यूंची नेमकी आकडेवारी (रिअल टाइम डेटा) मिळण्यात अडचणी येतात. रुग्णालयांकडून विलंब झाल्यास जिल्हास्तरावर ही माहिती संकलित करून ‘कोव्हिड पोर्टल’वर अपलोड करण्यात येते, मात्र या प्रक्रियेस वेळ लागतो आणि काही मृत्यूंची माहिती बराच काळ प्रलंबित राहते,’ असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

राज्यात एप्रिल व मे महिन्यात रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यांची सर्व यंत्रणा रुग्ण व्यवस्थापन, खाटांचे व्यवस्थापन, ऑक्सिजन व औषध पुरवठा या कामांमध्ये व्यग्र असल्याने त्या काळातील नोंदी प्रलंबित राहिल्या असून, त्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. करोना साथीतील प्रत्येक रुग्णाची व मृत्यूची नोंद होईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे विभागाने म्हटले आहे.

ताळमेळ घालण्यासाठी मुदत किती?

दोन्ही पोर्टलवरील माहिती आणि राज्याचा अहवाल यांमधील रुग्णसंख्या आणि मृत्यूंच्या संख्येचा ताळमेळ घालण्याची प्रक्रिया (रिकन्सिलिएशन) दर पंधरा दिवसांनी करण्यात येते, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. मात्र ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे उपलब्ध झालेल्या अहवालामध्ये गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून, म्हणजे तब्बल नऊ महिन्यांमधील मृत्यूंच्या नोंदीत ताळमेळ घातला गेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांत ११,६१७ मृत्यूंचा फरक असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केले होते. पंधरा दिवसांत २४७९ अतिरिक्त मृत्यूंची नोंद केल्याचे सरकारने मान्य केले आहे. मात्र, अजून किती मृत्यूंची नोंद होणे शिल्लक आहे, त्यासाठी किती वेळ लागणार याचे उत्तर दिलेले नाही. माहिती लपविण्याचा हेतू नसल्याचे सरकारचे म्हणणे असले, तरीही या पूर्वी कधीही अशा प्रकारे माहिती अद्ययावत करण्यास विलंब होत असल्याने मृत्यूंची संख्या वाढू शकते, असाही खुलासा यंत्रणेकडून केला गेला नव्हता. ‘मटा’च्या वृत्तानंतर आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात गेल्या ४८ तासांतील मृत्यू व त्या पूर्वीचे मृत्यू अशी विभागणी करण्यात येऊ लागली आहे.

Source link