देशाला महासत्ता बनविण्यासाठी व्यसनमुक्त, सुदृढ युवा पिढी घडविणे काळाची गरज- मंत्री गिरीश महाजन

देशाला महासत्ता बनविण्यासाठी व्यसनमुक्त, सुदृढ युवा पिढी घडविणे काळाची गरज- मंत्री गिरीश महाजन
- Advertisement -


नाशिक, दि. २ : विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील युवा पिढीने व्यसनमुक्त, निरोगी व राष्ट्राभिमानी बनणे आवश्यक आहे. युवकांच्या सामर्थ्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असून, व्यसनाधीनतेपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, योग आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

‘मेरा युवा भारत’, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’ कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस. स्वामी, महाराष्ट्र विज्ञान विज्ञापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मिलिंद आवारे, जिल्हा युवक अधिकारी अभिलाष म्हस्के यांच्यासह अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे. देशातील सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असून हीच युवा शक्ती देशाचे भवितव्य घडविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसित राष्ट्र आणि महासत्ता बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सक्षम, निरोगी आणि व्यसनमुक्त युवा पिढी निर्माण होणे अत्यावश्यक आहे. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. पालकांचा विश्वास जपून युवकांनी शिक्षण, क्रीडा, व्यायाम, योग आणि समाजोपयोगी कार्यात स्वतःला गुंतवावे.

महाविद्यालयीन स्तरावर युवकांमध्ये व्यसनांचे वाढते प्रमाण समाजासाठी गंभीर आव्हान आहे. क्षणिक आकर्षण, किंवा चुकीच्या संगतीमुळे व्यसनाधीन होणे ही अत्यंत घातक बाब असून युवकांनी अशा प्रवृत्तींपासून स्वतःला दूर ठेवावे, असेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

हवामान बदल, वाढते तापमान, अवकाळी पाऊस, गारपीट आणि नैसर्गिक आपत्ती ही पर्यावरणीय असंतुलनाची लक्षणे आहेत. या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असून प्रत्येकाने आपल्या परिसरात देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वड, पिंपळ, कडुनिंब यांसारख्या वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास तसेच जैवविविधतेचे संरक्षण करण्यास मदत होते. झाडे लावण्याबरोबरच ती जगविण्याची जबाबदारीही प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

इस्रायलसारख्या देशाचे उदाहरण देत मंत्री महाजन म्हणाले की, राष्ट्रप्रेम, शिस्त आणि कर्तव्यभावना यांच्या बळावर छोटा देशही जगात सक्षम स्थान निर्माण करू शकतो. भारतातील युवकांनीही राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या विकासासाठी स्वतःला सक्षम बनवावे. निरोगी, व्यसनमुक्त आणि चारित्र्यसंपन्न युवा शक्तीच विकसित भारताच्या निर्मितीचा मजबूत पाया ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ अभियानाचा संदेश प्रत्येक युवकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि व्यसनमुक्त, हरित व विकसित भारत घडविण्याचा सामूहिक संकल्प करावा, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले.

महापौर श्रीमती आडके म्हणाल्या,  विकसित भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जसे निरोगी जीवनासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे, तसेच निरोगी शरीर आणि मनासाठी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीने दिलेला योगाचा मार्ग स्वीकारल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहून व्यसनाधीनतेपासून दूर राहता येईल. युवकांनी स्वतः आदर्श निर्माण करून पुढील पिढीसमोर सकारात्मक उदाहरण ठेवावे. प्रत्येक युवकाने ‘मी व्यसन करणार नाही आणि इतरांनाही व्यसन करू देणार नाही’ असा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवकांशी संवाद साधून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे हा आहे. समाजात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या सेवनाची समस्या, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आणि इतर व्यसनाधीन प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थी भविष्यात समाजाचे नेतृत्व करणार असल्याने त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध करणारा कायदा, तंबाखूविरोधी जनजागृती तसेच गुटखाबंदीच्या निर्णयामुळे सकारात्मक बदल घडून आले आहेत. व्यसन ही केवळ शारीरिक समस्या नसून मानसिक आणि सामाजिक आरोग्याशी संबंधित बाब असल्याने त्याविरोधात व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

नशामुक्त भारत अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप द्या;
देशातील सामाजिक व आध्यात्मिक संघटनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे केलेल्या प्रबोधनपर मार्गदर्शन नशामुक्त भारताच्या संकल्पपूर्तीसाठी देशातील संत, आध्यात्मिक संस्था, सामाजिक संघटना आणि युवा शक्तीने समन्वयाने काम करून या अभियानाला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप द्यावे, असे आवाहन केले

देशभर कार्यरत असलेल्या आध्यात्मिक व सामाजिक संस्थांचे समाजातील व्यापक जाळे आणि त्यांच्याशी जोडलेली युवा शक्ती ही नशामुक्त भारत अभियानाची मोठी ताकद ठरू शकते, असे सांगून पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले की, येत्या १०० दिवसांत प्रत्येक संस्थेने एक आठवड्याची जबाबदारी स्वीकारून नशाविरोधी जनजागृती उपक्रमांचे नेतृत्व करावे. या काळात इतर सर्व संस्था व संघटनांनीही संबंधित संस्थेला सक्रिय सहकार्य करावे. प्रत्येक आठवड्याच्या अखेरीस रविवारी सर्व संघटनांनी एकत्रितपणे मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत. त्यानंतर पुढील आठवड्यात दुसऱ्या संस्थेने नेतृत्व स्वीकारावे. अशा प्रकारे देशभरातील विविध संघटनांनी नियोजनबद्ध पद्धतीने सहभाग नोंदविल्यास नशामुक्त भारत अभियानाला अभूतपूर्व लोकसहभाग लाभेल आणि समाजात सकारात्मक परिवर्तनाची प्रभावी चळवळ उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रबोधनपर मार्गदर्शन ऐकण्यासाठी मान्यवर व विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठातील विद्यार्थांनी सामूहिक व्यसनमुक्तीची शपथ घेतली.

००००

 

 



Source link

- Advertisement -