महसूल प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करा; योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसूल प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करा; योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
- Advertisement -


रायगड-अलिबाग, दि. ०१ (जिमाका): महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने अनेक नाविन्यपूर्ण, ऐतिहासिक व महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून गोरगरीब लोकांच्या कल्याणकारी शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवावा, असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

अलिबाग येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ व ‘महसूल दिन’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

या महत्त्वपूर्ण सोहळ्यास व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, माजी खासदार धैर्यशील पाटील, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार विक्रांत पाटील आणि सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर व कृषी सभापती वैकुंठ पाटील उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने कोकण विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, महसूल अपर आयुक्त श्रीमती वैशाली उंटवाल, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुनील इंदुलकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती.

आपल्या सविस्तर मार्गदर्शनात महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ यशस्वीरीत्या राबवले जात आहे. छत्रपती शिवरायांच्या राजधानीच्या जिल्ह्यात महसूल दिन साजरा होणे हा एक विशेष योग आहे. राज्यातील १४ कोटी जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करून त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क देणारा महसूल हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रशासनाचा पाठीचा कणा असलेला विभाग आहे.

महिला सक्षमीकरणांतर्गत शेतात व उद्योगात कार्यरत महिलांना ‘शेतकरी सन्मान कार्ड’ दिले जाणार आहे. शेतपाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करून त्यांना शासकीय दप्तरी नोंदणीकृत केले जात असून, अलिबाग तालुक्यातील मुळे गावातील पाणंद रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतपाणंद रस्ते पुढील तीन महिन्यांत शोधून त्यांचे सीमांकन करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. शेतात पाणी, वीज आणि पक्का रस्ता उपलब्ध झाल्यास शेतकरीपुत्र समृद्ध होईल आणि विकसित महाराष्ट्राची संकल्पना पूर्णत्वास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी, रहिवासी घरे कायदेशीर करणे, स्वामित्व व नक्षा योजनेद्वारे मोफत मोजणी, रेवस-रेड्डी महामार्गाची निर्मिती आणि वनहक्क पट्ट्यांतर्गत सुमारे ६० ते ६५ हजार आदिवासी बांधवांना मालकी हक्काचे ‘७ ई व १२ ई’ सातबारा देऊन त्यांच्या बळकावलेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी महसूल विभागाच्या गतिमान कारभाराचे कौतुक करत हा विभाग सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला असल्याचे सांगितले. दक्षिण रायगडमधील वाढत्या औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन नागरिकांच्या समस्यांचे प्रभावी निवारण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती व वाढदिवसाचे औचित्य साधून राबवलेल्या अभियानाचे कौतुक करत कोकणातील शेतकरी हा स्वाभिमानी व वेळेवर कर्ज फेडणारा असल्याचे अधोरेखित केले.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे पुढचे प्रगतीचे पाऊल म्हणजे हे महाराजस्व अभियान असल्याचे सांगत, प्रत्येक पंचायत समिती गणापर्यंत योजना पोहोचवण्याचे आणि महिला दिनानिमित्त विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले.

आमदार महेंद्र दळवी व आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या भाषणात शिवछत्रपतींच्या राजधानीच्या जिल्ह्यात रयतेचे राज्य साकारण्यासाठी आणि सर्वसामान्य लाभार्थ्यांना एकाच छताखाली योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अत्यंत स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले.

विभागीय आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल आणि प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्हा हा शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा असल्याची गौरवपूर्ण नोंद करत महसूल खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी व पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.

समारंभाच्या प्रारंभी मंत्री महोदयांसह सर्व मान्यवरांनी विविध शासकीय विभागांद्वारे उभारण्यात आलेल्या माहितीपूर्ण स्टॉल्सला भेट देऊन योजनांची पाहणी केली. राष्ट्रगीत आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. या सोहळ्यात महसूल दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महसूल मंत्री व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

००००



Source link

- Advertisement -