भरती परीक्षा सुधारणांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये टास्क फोर्सचा संवाद – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. 20 : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स उद्या सोमवार, 21 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संबंधित घटकांशी संवाद साधणार आहे.

                परीक्षा प्रक्रियेतील अडचणी, सूचना आणि अभिप्राय जाणून घेऊन त्याआधारे आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी करण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील संवाद कार्यक्रम स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. भरती परीक्षांशी संबंधित उमेदवार, संस्था तसेच इतर संबंधित घटकांना आपल्या सूचना व अभिप्राय टास्क फोर्सकडे [email protected] या ई-मेलवर पाठविता येणार आहेत.

    टास्क फोर्सने यापूर्वी 12 सप्टेंबर रोजी पुणे, 16 सप्टेंबर रोजी नागपूर आणि 17 सप्टेंबर रोजी अमरावती येथे संबंधित घटकांशी संवाद साधला आहे. या विभागांमधून प्राप्त झालेल्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करून भरती परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बाबींचा विचार केला जाणार आहे.

                याशिवाय कोकण विभागात  29 सप्टेंबर रोजी चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई, तर नाशिक विभागात 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे संवाद आयोजित करण्यात आला आहे. कोकण विभागासाठी [email protected], तर नाशिक विभागासाठी [email protected] या ई-मेलवर अभिप्राय देता येईल.

                विभागनिहाय संवादातून प्राप्त सूचनांच्या आधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे आणि परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी टास्क फोर्स शासनास शिफारशी सादर करणार आहे.
    ०००

    - Advertisement -