
मुंबई दि. ०७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि गतिमानता वाढविण्याच्या दृष्टीने विविध गुणात्मक व रचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणून उमेदवारांना वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली.
अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले, आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या 8 आणि सरळसेवा भरतीच्या 76 अशा एकूण 84 चाळणी परीक्षा यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत. शासनाकडून भरतीची मागणी प्राप्त होण्यापासून ते अंतिम निकाल जाहीर होईपर्यंतच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी विविध स्तरांवर कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 18 ते 21 दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य झाले असून, निकालासाठी होणारा प्रदीर्घ विलंब कमी करण्याबरोबरच एका महिन्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आपल्याविरोधात सातत्याने आरोप होत असल्याचे आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी म्हटले आहे. प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम आपण पदावर रुजू होण्यापूर्वीचा असून, तक्रार प्राप्त होताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एमपीएससीने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. विभागीय स्तरावर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.
एमपीएससीची प्रतिष्ठा अबाधित ठेवणे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे यथोचित फळ मिळावे, हा आपला प्रमुख उद्देश असल्याचेही भीमनवार यांनी म्हटले आहे. पारदर्शक आणि निष्पक्ष व्यवस्था उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, यापुढेही ते सुरू राहतील. तथापि माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षण सुद्धा मी या पदावर राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
0000

WhatsApp