मुंबई, दि. २१ : जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माजी मुख्य वैज्ञानिक तथा जागतिक किर्तीच्या भारतीय बालरोगतज्ज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यातील बालपोषण, कुपोषण प्रतिबंध आणि पोषण अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज्यातील बालआरोग्य सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेताना मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागामार्फत सुरू असलेल्या प्रभावी आणि लोकाभिमुख उपक्रमांची माहिती दिली.
डॉ. स्वामिनाथन यांनी देशातील ११२ आकांक्षी जिल्ह्यांमध्ये केलेल्या अभ्यासाच्या आधारे काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे मांडली. राज्यातील बालपोषण योजनांच्या अंमलबजावणीत डेटा गुणवत्तेला अधिक बळकटी देणे, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण व तांत्रिक सहाय्य वाढविणे तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागांतील कुपोषित बालकांची वेळेत नोंद होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोग्य, महिला व बालविकास, पंचायत राज आणि पाणीपुरवठा विभागांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधल्यास बालपोषण निर्देशांकात लक्षणीय सुधारणा होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, बालकांचे पोषण आणि सर्वांगीण विकास हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जागतिक स्तरावरील तज्ज्ञांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे राज्यातील पोषण अभियानाला अधिक बळ मिळेल.
0000






















WhatsApp