मुंबईला जागतिक ज्ञाननगरी बनण्याची संधी : भारतातील शिक्षण क्षेत्राचे भविष्य विषयावर तज्ज्ञांचे मत – महासंवाद

मुंबईला जागतिक ज्ञाननगरी बनण्याची संधी : भारतातील शिक्षण क्षेत्राचे भविष्य विषयावर तज्ज्ञांचे मत – महासंवाद
- Advertisement -

मुंबई, दि. 14 – जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा, सरकारी प्रोत्साहन, उद्योगक्षेत्राचा सहभाग आणि प्रेरणादायी शिक्षक यांच्या साहाय्याने भारताचे शिक्षण क्षेत्र जगात अग्रस्थान मिळवू शकते आणि मुंबई हे त्याचे प्रमुख केंद्र ठरू शकते. मुंबईला ‘जागतिक ज्ञाननगरी’ बनण्याची संधी असल्याचे मत मुंबई रायजिंग – क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
“मुंबई रायझिंग : क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे (LOIs) प्रदान कार्यक्रम आज मुंबईतील हॉटेल ताज येथे झाला. यावेळी आयोजित ‘भारतातील शिक्षण क्षेत्राचे भविष्य’ या विषयावरील विशेष परिसंवादात भारतातील शिक्षण क्षेत्राच्या भविष्यावर तज्ज्ञांनी सखोल चर्चा केली. या परिसंवादात रॉय कपूर फिल्म्सचे संस्थापक सिद्धार्थ रॉय कपूर, सॉफ्टबँक इंडिया चे माजी प्रमुख मनोज कोहली आणि अ‍ॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक मुनीश शारदा सहभागी होते.

विद्यार्थ्यांचे परदेशगमन रोखण्यासाठी संधी निर्माण करा – सिद्धार्थ रॉय कपूर
सिद्धार्थ रॉय कपूर म्हणाले, “भारतात सर्जनशील कलेसाठी संरचित प्रशिक्षणाच्या संधी कमी आहेत, म्हणून विद्यार्थी परदेशी जातात. परंतु परत आल्यावर त्यांना भारतीय प्रणालीशी जुळवून घेता येत नाही, असे सांगितले जाते. ही मोठी विसंगती आहे. आपल्याकडे कलाक्षेत्रातील प्रशिक्षण केंद्रे निर्माण करून ही परिस्थिती बदलता येईल. दक्षिण कोरियाने आपली संस्कृती, चित्रपट, खाद्यसंस्कृती जगभर पोहोचवली. भारतही अशा प्रकारे सॉफ्ट पॉवरचा प्रभाव निर्माण करू शकतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे धोका नसून संधी आहे. सर्जनशील क्षेत्रातही एआयचा योग्य वापर करून दर्जेदार काम करता येईल. उद्योग आणि एआय कंपन्यांनी एकत्र प्रयोगशाळा उभारल्या, तर नैतिक व सामाजिक समस्या आधीच सोडवता येतील,” असेही श्री. रॉय यांनी सांगितले.

मुंबईचे रूपांतर जागतिक शिक्षण केंद्रात होऊ शकते – मुनीश शारदा
अ‍ॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक मुनीश शारदा म्हणाले की, पुढील सात वर्षांत भारताचा नवा चेहरा उभा राहील. मुंबईकडे ज्ञाननगरी होण्याची पूर्ण क्षमता आहे. शिक्षणासाठी पायाभूत सुविधा, दर्जेदार प्राध्यापक, प्रयोगशाळा, रोजगार संधी आणि जागतिक दर्जाचे विद्यार्थी हे सर्व इथे उपलब्ध होऊ शकतात. योग्य नियोजन आणि गुंतवणुकीद्वारे मुंबई न्यूयॉर्क, बोस्टन आणि सिंगापूरलाही मागे टाकू शकते.
शिक्षणासाठी भांडवल आवश्यक आहे. बँकांनी शिक्षण कर्ज, व्यवहार प्रणाली, आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून महत्त्वाची भूमिका बजावावी. सरकारने ‘मुंबई शिक्षण सार्वभौम निधी’ स्थापन करून शिक्षणात दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना द्यावी,” अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

उद्योग, सरकार आणि शिक्षक यांची त्रिसूत्री आवश्यक – मनोज कोहली
मनोज कोहली यांनी शिक्षण क्षेत्राच्या दीर्घकालीन यशासाठी सरकारचे प्रोत्साहन, उद्योगक्षेत्राचे सहभाग आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक हे तीन महत्त्वाचे घटक अधोरेखित केले. मुंबईतील पाच नव्या विद्यापीठांची घोषणा ही सुरुवात आहे. २०४७ पर्यंत आपल्याला जागतिक दर्जाची ज्ञाननगरी घडवावी लागेल. त्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षक तयार करणे, संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे शिक्षण देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारताकडून जागतिक गुंतवणूक अपेक्षित आहे. आपल्याकडे प्रतिभावान विद्यार्थी आहेत, परंतु दर्जेदार शिक्षणसंस्था नाहीत. ही पोकळी भरून काढल्यास मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतात येऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
०००००

- Advertisement -