शेतकऱ्यांच्या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद

शेतकऱ्यांच्या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद
- Advertisement -

शेतकऱ्यांच्या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – महासंवाद

मुंबई, दि. १३ : पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प व अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याच्या निर्देश जलसंपदा  (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.

राहुरी-शनी शिंगणापूर प्रस्तावित रेल्वे मार्ग आणि पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प यामुळे निर्माण झालेले अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, तसेच पुणतांबा जंक्शनवर शिर्डीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याबाबतच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.

जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, रेल्वे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या आहेत. आता प्रकल्प झाला म्हणून त्यांचा त्याग विसरणे इष्ट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने तोडगा काढावा. तसेच पुणतांबा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या प्रवेशमार्गाचा प्रश्न सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री विखे-पाटील यांनी दिले.

पुणतांबा-शिर्डी मार्गावरील रेल्वे गाड्यांना पुणतांबा जंक्शन येथे थांबा देण्यात यावा, तसेच रेल्वे दुहेरीकरणाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवर परिणाम होऊ नये अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. काही ठिकाणी रेल्वे प्रशासनाने कुंपण घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग बंद झाल्याची तक्रारही मांडण्यात आली.

बैठकीत रेल्वे प्रशासनाकडून पुणे–नाशिक रेल्वे मार्गाबाबत सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पात खोडद येथील जीएमआरटी वेधशाळेच्या कार्यावर परिणाम होऊ नये यासाठी रेल्वे मार्गाचे संरेखन बदलण्याचा पर्याय विचारात घेतल्याची माहिती देण्यात आली. वेधशाळेच्या अँटेना परिसरापासून किमान अंतर राखण्यासाठी मार्गात बदल करण्याबाबतही चर्चा झाली.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ता, बोगदा किंवा इतर सोयी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीस आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) भुवनेश कुमार गुप्ता, मुख्य अधिकारी विजय कुमार राय तसेच रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, पुणतांबा, राहुरी, संगमनेर, अकोले परिसरातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.

0000

किरण वाघ/वि.सं.अ

- Advertisement -