शिर्डी ,दि. २५ (उमाका): तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून सर्व विकासकामे पूर्ण झाल्यावर सरला बेट महाराष्ट्रातील भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा केंद्र असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सरला बेट विकासाचा आराखड्याच्या माध्यमातून सभागृह, रस्ते, पूरसंरक्षण आणि सौरऊर्जा यासह विविध कामे सुरू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विठ्ठल लंघे, अमोल खताळ, आशुतोष काळे, विवेक कोल्हे, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, महंत रामगिरी महाराज, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आदी उपस्थित होते.
सदगुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सरला बेटावर या ठिकाणाहून समाजाला विचार आणि प्रेरणा मिळते. हरिनाम संकीर्तनामुळे दुःखाचे हरण होते, मनातील ‘मी’पणा दूर होतो आणि जातीभेद विसरून सर्वजण एकत्र येतात. प्रत्येकामध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्याची भावना निर्माण होते. आजच्या जगामध्ये हरिनाम संकीर्तन समाजाला एकत्र आणणारा आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारा मोठा उपाय आहे.
भारताची संस्कृती आणि सभ्यता जगातील सर्वात जुनी असून, हजारो वर्षांपासून या भूमीवर सनातन विचार, संस्कार आणि आध्यात्माची परंपरा अखंड सुरू आहे. अनेक आक्रमणे झाली तरी आपल्या विचारांना, संस्कारांना आणि श्रद्धेला कोणीही बदलू शकले नाही. वारकरी परंपरा, गुरु परंपरा आणि हरिनामाच्या शक्तीमुळे ही संस्कृती अखंड राहिली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हरिनाम संकीर्तनात शेतकरी बांधव सहभागी होत असल्याचा उल्लेख करतांना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी, वारकरी, शेतमजूर आणि समाजातील वंचित घटाकांच्या विकासासाठी शासन प्रयत्न करीत आहे. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पूर्ण करत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली असून, ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू आहे. दर पंधरा दिवसांनी नवीन पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात आहे.
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळत आहे. टप्प्याटप्प्याने १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येईल. पुढील काळात वर्षभार १२ तास मोफत वीज देण्याचा निर्धाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांची ५८ हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचेही श्री.फडणवीस म्हणाले.
हरिनाम सप्ताह समाजाला एकत्र आणणारा आध्यात्मिक सोहळा –एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अखंड हरिनाम सप्ताह हा अलौकिक सोहळा असून, या भूमीला योगीराज गंगागिरी महाराजांच्या तपश्चर्येचा आणि आशीर्वादाचा स्पर्श लाभला आहे. महंत रामगिरी महाराजांच्या अमृतवाणीतून भक्तीचा अखंड प्रवाह सुरू आहे. हरिनाम सप्ताह हा केवळ धार्मिक सोहळा नसून समाजाला एकत्र आणणारा, भक्ती आणि संस्कारांची ऊर्जा देणारा सोहळा आहे.
गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली १७९ वर्षांची ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पुढे सुरू आहे. या सप्ताहामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, प्रसन्नता आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘गावची एकी तर देवाची कृपा नक्की’ याचा प्रत्यय या सप्ताहातून येत असून, पंचक्रोशीतील नागरिकांचे ऐक्य येथे दिसून येत आहे, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
शेतकरी आणि महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा उल्लेख करत ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहील. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसोबत राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, अशी शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही श्री.शिंदे यांनी नमूद केले.
अखंड हरीनाम सप्ताह समाजाला दिशा देणारा –डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले, अखंड नामसप्ताह हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणणारा, शांती देणारा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा आध्यात्मिक सोहळा आहे. सात दिवसांच्या नामस्मरणातून आणि महंत रामगिरी महाराजांच्या मधुर वाणीतून परस्परांमध्ये प्रेम, बंधुभाव वाढविण्याचा तसेच व्यसनमुक्त आणि बलशाली समाज घडविण्याचा संदेश मिळतो.
महंत रामगिरी महाराज अध्यात्माचा वारसा पुढे नेत असून, त्यांच्या आध्यात्मिक चळवळीचे समाजाला दिशा देण्याच्यादृष्टीने मोठे महत्त्व आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून संतांचे विचार आणि संस्कार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचत आहेत. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासन आवश्यक सहकार्य करेल, अशी ग्वाही डॉ.विखे पाटील यांनी दिली.
वंदे मातरम् गीताच्या समूह गायन बद्दल महंत रामगिरी महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान पत्र देण्यात आले. सोनियाचा दिन आज उगवला या अभंगाच्या तालावर उपस्थित मान्यवरांनी फुगडी खेळली.
0000









WhatsApp